पाथर्डी – दुधाला दरवाढ मिळावी या प्रमुख मागणीसह पाथर्डी तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी दूधउत्पादक व शेतकऱ्यांनी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या फोटोसमोर दूध ओतून दुग्धाभिषेक आंदोलन केले. आदिनाथ देवढे याने या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनापूर्वी दूधउत्पादकांनी शहरातून दुचाकीवर दुधाचे कॅन घेऊन मोर्चा काढत सरकारचा निषेध व्यक्त केला. नाईक चौकात सुमारे अडीच तास आंदोलन केले.
या वेळी दुलेचांदगाव सोसायटीचे संचालक दत्ता बडे, प्रा. सुनील पाखरे, दत्ता पाठक, अक्षय वायकर, विशाल भोईटे, संदीप देवढे, नागेश रोडे, ज्ञानेश्वर खवले, सतीश शिरसाट, प्रदीप चन्ने, ज्ञानेश्वर काकडे, शहादेव भाबड, मंगेश मदगुल, दत्तू चितळे, दत्तू दातीर, महादेव मरकड, ज्ञानेश्वर शेळके, पप्पू केदार, मल्हारी आठरे, गणेश गिऱ्हे, अजिनाथ पुंड, नारायण कोलते, तुकाराम देवढे, गणेश गाडेकर, भीम गर्जे, प्रवीण केदार आदी उपस्थित होते.
दुधाला शासकीय हमीभाव मिळावा. सरकारने अध्यादेश काढूनही हमीभाव नाकारणाऱ्या सहकारी संघावर गुन्हे दाखल करावेत. जनावरांना चारा डेपो व औषधालय उपलब्ध करून द्यावीत. पाथर्डी तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा. पशुखाद्याच्या किमती नियंत्रणात आणाव्यात आदी प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर आंदोलनादरम्यान दूध ओतून मांडल्या.
आदिनाथ देवढे म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात गंभीर दुष्काळ असूनही अनेक मंडले दुष्काळापासून वंचित ठेवली आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. दुष्काळी परिस्थितीने खचलेला शेतकरी नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत पशुधन वाचवणे जिकिरीचे झाले आहे. राज्य सरकारने पाठीमागे दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर जाहीर करूनही राज्यातील सहकारी संघ आणि खासगी प्रकल्पाने संगनमताने दुधाचे दर पाडले आहेत. तर दुसरीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. आज अन्नभेसळ प्रतिबंधक यंत्रणा आपल्या हातात आहेत. मिल्को मीटर, वजन तपासणी पथके सरकारकडे आहेत. मग सरकारातील मंत्री याचा वापर का करत नाहीत? गत पाच वर्षांत आपण दूध भेसळ करणाऱ्यांवर किती कारवाया केल्या? असे सवाल उपस्थित केले.
आवश्यक पर्जन्यमापन यंत्रणा पुनर्रचना झालेल्या नवीन मंडळांना नसल्याने अकोला मंडलाचा समावेश हा दूष्काळी यादीतच राहील, असे आश्वासन तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिले. बबन खेडकर, तुळशीराम सानप, शाकीर शेख, वसंत खेडकर, तुकाराम देवढे, प्रेमचंद खंडागळे, एकनाथ वाकचौरे, अंबादास ठोंबरे, तुळशीराम सानप, भाऊसाहेब देवढे, अशोक डोईफोडे, विश्वजित कटके, शेखर देवढे, गहिनीनाथ गर्जे आदी शेतकऱ्यांसह अनेक दूधउत्पादक उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, गुप्तवार्ताचे भगवान सानप यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
प्रश्न जैसे थे, विखेंना लोकसभेचे डोहाळे!
दुष्काळी परिस्थिती असूनही त्यातून पाथर्डीसारखा असणारा सततचा दुष्काळी भाग दुष्काळी यादीतून वगळला गेला. त्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन द्यावे लागते हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांसह असंख्य लोकांचे प्रश्न आहेत. मात्र, ते प्रश्न कोणी सोडायचे? ते न सोडविता विखेंना आता लोकसभेचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका आंदोलनाचे नेतृत्व करणारे आदिनाथ देवढे यांनी केली.