नगर – राजकीय श्रेयवादातून थेट निधीलाच ब्रेक लावण्यात आल्याने महापालिकेची 20 कोटीहून अधिक विकास कामे ठप्प झाली होती. याबाबत महापौर रोहिनी शेंडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन निधीची मागणी केली. तरीही हा निधी काही उपलब्ध झाला नाही. मात्र नुकताच जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला जिल्हास्तर नगरोत्थान, दलितेतर वस्ती सुधार योजना व अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून 20 कोटी 45 लाख निधी उपलब्ध दिला आहे.
जिल्हा नियोजन समितीतून दरवर्षी जिल्हास्तर नगरोत्थान योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती (दलीत वस्ती) सुधार योजना व नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला जातो. चालू आर्थिक वर्षात या निधीचे वितरण महापालिकेला झालेले नव्हते. जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मंजुरीचे पत्र आल्यानंतर त्यातून शहरातील विविध विकास कामे प्रस्तावित केली जातात. कामांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर झाल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाते व महापालिकेमार्फत ही कामे केली जातात.
महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असून शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महापौर आहे. महापालिकेत शिवसेनेचा महापौर असल्याने व निधीतून कामे प्रस्तावित करण्याचे अधिकार महापौरांकडे असल्यानेच भाजपच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मंडळातून महापालिकेला दिला जाणाऱ्या निधीचे वितरण थांबवल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. या संदर्भात महापौर शेंडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
अखेर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस महापालिकेचा थांबवण्यात आलेला निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापालिकेला जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून 7.03 कोटी, दलितेतर वस्ती सुधार योजनेतून 7.56 कोटी व अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून 5.86 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिकेला याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. यातून शहरातील रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.