शेवगाव – यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारपर्यंत दि. 15 चा अल्टीमेटम शेतकरी संघटनेने दिला होता. मात्र कारखाना प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने बुधवारी तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याच्या परिसरात तसेच भातकुडगाव फाट्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने संघटनेच्या कार्यकर्त्यानी रोखून धरली. यावेळी झालेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी ही कोंडी फोडण्यासाठी मध्यस्थी करून सोमवारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी, साखर उपायुक्त, प्रांताधिकारी आदिच्या उपस्थितीत बैठक आयोजित केल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
चालू हंगामासाठी साखर कारखान्यांनी अद्यापपर्यंत उसाचा दर जाहीर केला नाही. म्हणून बुधवारी शेवगाव- पैठण हम रस्त्यावरील गंगामाई साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर जाहीर करीत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे उसाची वाहतूक होवू दिली जाणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला,तर नेवासा रस्त्यावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, मच्छिंद्र आरले, संतोष गायकवाड, संदीप मोटकर आदिसह कार्यकर्त्यांनी उसाची वाहने रोखून धरली होती.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वरचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांच्यासह संचालक मंडळाशी सविस्तर चर्चा करून ज्ञानेश्वरने तातडीने ऊस दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, उपाध्यक्ष दत्ता फुंदे, संतोष गायकवाड, मच्छिंद्र आरले, बाळासाहेब फटांगडे, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, संदीप मोटकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, रमेश कचरे, दादा पाचरणे, दादा टाकळकर, रामेश्वर शेळके, विकास साबळे, नाना कातकडे, रामेश्वर शेळके, शिवाजी साबळे, अमोल देवढे, तसेच शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.