संगमनेर – शहरातील उपकारागृहातील चार आरोपींनी गज कापून पळ काढला होता. या प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांचेही निलंबन झाले होते. त्याचबरोबर संगमनेर पोलिसांची लक्तरे या प्रकरणात वेशीला टाकले होते. परंतु अवघ्या 30 तासांत स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पळालेल्या चार आरोपीसह त्यांना मदत करणारे दोघेजणही ताब्यात घेऊन संगमनेर पोलिसांच्या हवाली केले, मात्र त्यांना मालेगावात मदत करणारा बडा मासा तेथेच सोडून आल्याने पोलीस दलात उलटसुलट चर्चा रंगत असताना शहर पोलिसांच्या पथकाने त्यालाही ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर संगमनेर शहरातील पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या उपकारागृहाचे तीन गज कापून राहुल देविदास काळे ( वय 31 रा. वडगाव पान, संगमनेर), रोशन रमेश दधेल उर्फ थापा (वय 25, रा. इंदिरानगर मूळ रा नेपाळ), मच्छिंद्र मनाजी जाधव आणि अनिल छबु ढोले (रा.ढोलेवाडी) हे वेगवेगळ्या गुन्ह्यातील चार आरोपी पळून गेले होते. जवळपास महिनाभर गज कापण्याचा प्रकार सुरू होता, तर कारागृहात मोबाईलचा सर्रास वापर, पळून जाण्याच्या कितीतरी दिवस आधीच कारागृहात पोहोचलेला गावठी कट्टा, पळून जाण्याच्या नेमक्या त्याच वेळी एक वाहन पोलीस ठाण्याच्या आवारात उभे राहणे या काटेकोर नियोजनाचा विचार केला असता कोणीतरी मोठा त्यांना मदत करत असल्याचे जाणवते.
आरोपींचे वाहन नादुरुस्त झाल्याने ज्या हॉटेलमध्ये ते मुक्कामी थांबले याची माहिती संगमनेर पोलिसांना मिळाली होती, मात्र त्यावेळेस स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच भागात असल्याने त्यांना ताब्यात घेण्यास यश मिळाले आणि या ठिकाणी त्या चौघांसोबत त्यांची साथ देणाऱ्या अल्ताफ असिफ शेख (रा भोसरी, जिल्हा पुणे, मूळ रा कुरण) व पुण्याहून चारचाकी वाहन घेऊन संगमनेरात आलेला चालक मोहनलाल नेताजी भाटी (वय 47 , रा. वडगाव शेरी, पुणे) या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथील नामचीन व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कारागृहातून पळून गेल्यानंतर ते सहा जण जवळपास दोन तास या माणसाकडून पाहुणचार घेत होते. याची माहिती त्याने पोलिसांना देणे आवश्यक होते. स्थानिक गुन्हे शाखेनेही त्या नामचीन व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देणे महत्त्वाचे होते. मात्र तसे काहीच घडले नाही. उलट या पथकाने आपलीही सोय त्या व्यक्तीकडे लावली आणि आपलाही पाहुणचार करून घेत त्याला तिथेच सोडून दिल्याची माहिती मिळाली.
संगमनेर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील रिजवान मोहम्मद अकबर ऊर्फ रिजवान बॅटरीवाला (वय 50) याला गुरुवारी रात्री अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत आरोपींना पळवून जाण्यास मदत करणाऱ्या सात जणांची नावे समोर आली असून प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय 24, रा.घुलेवाडी) कलीम अकबर पठाण (रा.कोल्हेवाडी) व हलीम अकबर पठाण (वय 22,जमजम कॉलनी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर सलीम अकबर पठाण (रा.संगमनेर) हा अद्याप पसार आहे.