अहमदनगर – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर आज अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमदनगरमधून भाजपाने काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सुजय यांना अहमदनगरमधून पक्षाने तिकीट दिल्याने येथील विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापले गेले आहे. पक्षाने आपले तिकीट कापल्यानंतर गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती मात्र गांधींची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले होते.
दरम्यान, मोदींच्या आजच्या सभेमध्ये त्यांच्या आगमनापूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. यावेळी खासदार दिलीप गांधी यांनी देखील भाषण केले. त्यांचे भाषण सुरु असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण उरकते घेण्याची सूचना केली. मात्र यामुळे गांधींना राग अनावर झाला. ते चढ्या स्वरात म्हणाले की, “मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही, असं म्हटलं जातं. पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे.” यावेळी बोलताना गांधी यांचे डोळे देखील पाणावले होते.
मात्र आज घडलेल्या या प्रकारामधून लोकसभेचे तिकीट कापल्याची खदखद गांधी यांच्या मनामध्ये कायम असल्याचे जाणवले. स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांमध्ये दुफळी माजली आहे काय असा प्रश्न देखील आज राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात होता.