कडाची वाडी परिसरात दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाळुंगे इंगळे- वनविभागाच्या कडाची वाडी (ता. खेड) हद्दीत राजरोसपणे राडारोडा घेऊन येणारी वाहने आणि कचऱ्याची वाहने खाली केली जात आहेत. आळंदी फाटा परिसरातील औद्योगिक भागातील हा कचरा असून, रात्रीच्या वेळी या भागात आणून टाकण्यात येत असल्याचे पर्यावरण प्रेमी सांगत आहेत. मोठ्या प्रमाणावर या भागात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचरा, राडारोडा पडल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
आळंदी फाट्यालगतच्या औद्योगिक क्षेत्रातील उपाहारगृहे, कंपन्यामधील भंगारात न जाणारा कचरा रस्त्याच्या कडेने आणून टाकण्याचे प्रकार अव्याहतपणे सुरू आहेत. प्लॅस्टिकचे कप, पिशव्या असा नष्ट न होणारा कचरा, टाकाऊ अन्न त्याचप्रमाणे बांधकामातील राडारोडा असे निरुपयोगी साहित्य रस्त्यालगत साचत असून, दुर्गंधीमुळे या परिसरात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मेलेल्या कोंबड्या, ओला-सुका कचरा आणि वैद्यकीय टाकाऊ कचरा, तसेच औद्योगिक कचरा राजरोसपणे आणि बिनदिक्कतपणे टाकला जात असल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे.
- दोन वर्षांपूर्वी 17 हजारांचा दंड वसूल
दोन वर्षांपूर्वी आळंदी रस्त्यावर वन जमिनीत कचरा टाकणाऱ्या चौघांवर दंडात्मक कारवाई करून सतरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस बंद झालेले हे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.