कोपरगाव – कोपरगाव मतदारसंघात चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून दुष्काळ जाहीर झालेल्या मंडलातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु ज्या मतदारसंघात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देणेबाबत आदेश देण्यात आलेले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच दुष्काळसदृश्य मंडळातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई अनुदान मिळावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिशय कमी पर्जन्यमान होऊन खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत राज्य शासनाने १५ जिल्ह्यांतील २४ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ व १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. यामध्ये खरीप हंगामातील अंतिम आणेवारीसाठी करण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगाअंती पिक निहाय आणेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकांचे ३३ टक्के नुकसान ठरविण्यात यावे, तसेच प्रमुख पिक नसलेल्या व पिक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांना सुद्धा मदत अनुज्ञेय राहील, असे नमूद करण्यात आलेले आहे.
शासनाकडून राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १०२१ महसुली मंडळामध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. परंतु दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या मंडळात मात्र नुकसान भरपाई देण्याचे नमूद करण्यात आलेले नाही.त्यामुळे कोपरगाव मतदारसंघासह राज्यातील १०२१ महसुली मंडळातील शेतक-यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे सर्वच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मिळावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनात केली आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही करून एकाही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही विखे पाटील यांनी आ. काळे यांना दिली.