नगर (प्रतिनिधी) – शहराचे खड्डेमय रस्त्यांचे प्रकरण चांगलेच गाजले असताना न्यायालयाने महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांना खड्ड्यांप्रश्नी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी महापालिकेविरोधात जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता.
या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. शहराच्या रस्त्यांवरील खड्डड्यांच्या गंभीर प्रश्नावर न्यायालयाने आयुक्त व शहर अभियंत्यांना 7 मार्च रोजी पुढील तारखेच्या सुनावणीप्रसंगी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे.
शहरातील रस्ते निकृष्ट व खड्डेमय होण्यास जबाबदार असणाऱ्या महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, शहरातील खड्डेमय रस्ते चांगल्या दर्जाचे मजबूत, खड्डे व धूळमुक्त करण्यात यावेत, या मागणीसाठी भांबरकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
शहरातील खड्डयांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, निकृष्ट काम व टक्केवारीमुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिका कर रुपाने जनतेकडून पैसे गोळा करते. त्या मोबदल्यात नागरिकांना नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. रस्ते व्यवस्थित ठेवून त्याची निगा राखणे व इतर मूलभूत नागरी सुविधा पुरविण्याचे काम होताना दिसत नाही. शहरातील अनेक रस्तेच खड्डे व धुळीने माखले आहेत. याला पूर्णत: जबाबदार महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी आहेत.
ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता तपासली जात नसल्याने शहर खड्डेमय बनले असल्याचे भांबरकर यांनी सांगितले. या संदर्भात भांबरकर यांच्या बाजूने न्यायालयात ऍड. शिवाजी सांगळे व ऍड.संतोष शिंदे बाजू मांडली.