नवी दिल्ली – पंजाबमध्ये भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यावर पंजाबमधील बेकायदेशीर वाळू खाणींचा तपास केला जाईल, असे आश्वासन आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरनजीत सिंग चन्नी यांना बेकायदेशीर वाळू खाणींच्या आरोपातून “क्लीन चीट’ देण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. चन्नी यांनी या आरोपांवरून केजरीवाल यांना “खोटारडे’ म्हटले आहे.
चन्नी यांनी स्वतःचाच तपास केला आहे. जेंव्हा चन्नी यांच्या नातेवाईकांनी सर्व पैसे चन्नी यांचेच असल्याचे कबूल केले आहे, तर मग ईडीकडून चन्नी यांना अटक का केली जात नाही आहे ? जेंव्हा भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री बनतील तेंव्हा या प्रकरणाचा पारदर्शक तपास केला जाईल, असे केजरीवाल म्हणाले.
चन्नी ज्या दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत, त्या दोन्ही ठिकाणांवरून ते पराभूत होत आहेत. त्यांचा पराभव “आप’चे उमेदवारच करणार आहेत. जर ते आमदारच होऊ शकणार नाहीत, तर मग ते मुख्यमंत्री तरी कसे होतील, असेही केजरीवाल म्हणाले.
पंजाबमधील रोपार जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांनी चन्नी यांना बेकायदेशीर वाळू खाणींच्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपातून शुक्रवारीच “क्लीन चीट’ दिली आहे. चन्नी यांच्याच चमकूर साहिब विधानसभा मतदार संघात बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्याचा आरोप केजरीवाल यांनी चन्नी यांच्यावर केला होता.