कोपरगाव (प्रतिनिधी) – अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिर निर्माण कार्यास कोल्हे परिवाराकडून 101 किलो तांब्याच्या धातूचे दान करण्यात आले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी बेलापूर येथील गोशाळा प्रमुख महेशजी व्यास महाराज यांची भेट घेवून ही मदत श्री राम मंदिर कोषाध्यक्ष आचार्य गोविंदगिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्याची विनंती केली.
अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झाले आहे. मंदिर उभारणी करत असताना वापरल्या जाणाऱ्या दगडांना जोडण्यासाठी तांब्याच्या पट्ट्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 हजार पट्ट्या वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे भाविकांनी तांब्याच्या पट्ट्या दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव परिसरातून भाविकांच्या वतीने किमान एक टन तांबे पाठवण्याचा माणस व्यक्त करून या उपक्रमाची सुरूवात कोल्हे परिवाराच्या वतीने 101 किलो तांबे देवून सुमित कोल्हे यांनी केली. यावेळी बेलापूरचे उपसरपंच रवी खाटोड, मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांतजी लढ्ढा उपस्थित होते. यावेळी कोल्हे म्हणाले, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे हे धार्मिक व सामाजिक कार्यात सतत पुढे असतात. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट देण्यात आली आहे.