पाथर्डी – माजी आ. स्व. राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित हास्य कवी संमेलनाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमेलनात सहभागी झालेल्या सर्वच कवींनी सादर केलेल्या कवितांनी रसिकांना मनमुराद हसवले, तर कधी गंभीरही केल्याने या कविसंमेलनाचा काव्यप्रेमींनी मनमुराद आस्वाद घेतला. स्व. राजळे हयात असताना ते आपल्या वाढदिवशी आवर्जून कवी संमेलनाचे आयोजन करायचे. यंदाही आदी फौंडेशन व राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीने स्व. माधवराव निऱ्हाळी नाट्यगृहात हास्यकवी संलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी राज्यात सध्या चालू असलेल्या मंत्री भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यातील वादावर पडदा टाकताना जरा अंगी येता बळ, जातीचीच कळ, भूजातले बळ दर्शवती, ढासळला आता सारा गावगाडा, वेशीतच राडा दिगज्जांचा या आशयाची कविता सादर करत कार्यक्रमाला सुरवात केली. त्या नंतर या काव्य संमेलनात सहभागी झालेले कवी शिवाजी सातपुते यांनी काय ते पत्रात लिवा, बंडा जोशी यांनी याड लागलं, याड लागलं,
मोबाईलचे याड लागलं, भारत दौन्डकर यांनी एका तराजूला तीन काटे जमत नाही अन् पहाटेच्या शपथविधीचा आवाज होत नाही ही रचना सादर केली. त्यानंतर अरुण म्हात्रे यांनी तुला पहिले मी फुले वेचताना केले. या शिवाय संमेलनात सहभागी झालेल्या प्रशांत केंदळे, अनिल दीक्षित, प्रशांत मोरे, इंद्रजित घुले यांनी आपल्या रचना सादर करत रसिकांना मनमुराद हसवले. कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी आई म्हणजे दुधावरची साय असते या रचनेने केली. शिंदे यांनीच सादर केलेल्या राज्य म्हणजे जयांचे, जो जो करील तयांचे, कधी तरी लोकशाहीचे अन्यथा शाहीर लोकांचे या रचनेला रसिकांनी चांगलीच दाद दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र सुरवसे, दादासाहेब येडे, रमेश काटे, डॉ सुहास उरणकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास आ. मोनिका राजळे, उद्धव वाघ, अर्जुन शिरसाठ, माणिक खेडकर, विष्णुपंत अकोलकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, सुभाष बर्डे, सुभाष ताठे, शेषराव कचरे, संजय बडे, अजय रक्ताटे, अमोल गर्जे, बापूसाहेब भोसले, डॉ. बाळकृष्ण मरकड, बंडूशेठ बोरुडे, नामदेव लबडे, अजय भंडारी, शिवाजी मोहिते, डॉ. रमेश हंडाळ, बाळासाहेब गोल्हार उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी, सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी, तर आभार विष्णुपंत अकोलकर यांनी मानले.