जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
विद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाल्यावर व्यासपीठावर शरद पवार यांचे आगमन होताच. किल्लारी भूकंप झाल्यानंतर मदत कार्याला दुर्घटनेच्या ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचणारे हेच ते साहेब. महाराष्ट्रामध्ये आज दिसणारा बहुतांशी विकास घडवणारे हेच ते साहेब. असे ध्वनी किल्प लावण्यात आली. यावेळी किल्लारी भूकंपाच्या दुर्घटनेच्या वेळी साहेबांनी केलेल्या मदतीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
जामखेड – बारामतीतील कृषी विज्ञान मार्गदर्शन केंद्रामुळे कमी पाण्यात उत्तम शेती करणारे तंत्रज्ञान विकसित झाल्याने शेतकरी समृद्ध होण्यास मदत झाली. कर्जत-जामखेड तालुक्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राची गरज आहे. यासाठी बारामतीच्या धर्तीवर जिल्ह्यात कृषी विज्ञान प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र उभारण्याचे माझे स्वप्न असून ते केंद्र कर्जत-जामखेड सारख्या तालुक्यात उभारणार आहे. यासाठी तालुक्यातील पुढाऱ्यांनी शंभर एकर जमीन द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील होते. यावेळी प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, आ. दिलीपराव वळसे पाटील, उपाध्यक्ष अरुण कडु पाटील, उपाध्यक्ष भगिरथी शिंदे, सदस्य मिनाताई जगधने, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, दादाभाऊ कळमकर, संस्थेच्या सचिव भाऊसाहेब कराळे, घनश्याम शेलार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, युवती जिल्हाध्यक्ष संध्या सोनवणे, संजय नागापुरे, राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रा.मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कॉंग्रेसचे रमेश आजबे, शरद भोरे, सुरेश भोसले, नागेश विद्यालयाचे प्राचार्य एस.जी.काळे, मुख्याध्यापिका के. डी. चौधरी, अधिक्षक एन. बी. शिर्के आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील व दादासाहेब पाटील यांनी या दुष्काळी परिसरात फिरून सर्वसामान्यांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. यासाठी नगर जिल्ह्याने मोलाची मदत केली. जामखेड येथील जुन्या जाणकरांनी सहकार्य केले यात कै. उत्तमचंद गुगळे, कै.लोहकरे, कै. रंजिकांत आरोळे, कोठारी परिवार यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. रयत शिक्षण संस्थेने कधीही शिक्षणाचा व्यापार मांडला नाही. प्रवेशासाठी कधीही डोनेशन घेतलेले नाही.
खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षण दिले आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्था ही आत्मविश्वास निर्माण करणारी संस्था आहे. अमेरिका व ब्राझील या देशात तेथील सर्वांनी तंत्रज्ञान आवश्यक मानल्यामुळे तेथील उत्पादनात वाढ झाली. महाराष्ट्रात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधक असून पाच हजारपेक्षा जास्त शास्त्रज्ञ आहेत.त्यांनी शेती, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसायामध्ये काम केले आहे. दक्षिण कोरिआ हा देश महाराष्ट्रापेक्षा निम्मा असून त्याने स्किल डेव्हलपमेंटमध्ये चमत्कार केला आहे.
आज जामखेडकडे येत असताना अनेक गावांचे लोक भेटले. यावेळी अनेक समस्या मांडल्या प्राधान्याने मतदानसंघाचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यावर मात करण्यासाठी कमी पाण्यावर कशा प्रकारे शेती करता येईल, हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आधुनिक कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये उभारले. यामुळे शेतकरी समृद्ध होण्यास मोठी मदत झाली आहे. बारामतीच्या धर्तीवर कर्जत – जामखेड तालुक्यात उभारणार आहे.
रोहित पवार म्हणाले, सर्व सामान्यांच्या मदतीवरच रयत शिक्षण संस्था उभी आहे. कोल्हापूर, सांगली येथे झालेल्या पुरग्रस्तांना रयतच्या वतीने मोठी मदत झाली. ग्रामीण भागात रयतच्या माध्यमातून मोठी ताकद उभी राहिली आहे. मतदारसंघात फिरत असतात अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. यासाठी नोकरी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस रोहित पवार यांची व्यक्त केला. प्रस्तावित दादाभाऊ कळमकर तर सुत्रसंचलन संतोष सरसमकर यांनी केले. आभार प्राचार्य संपतराव काळे यांनी मानले.