ram mandir – अयोध्येतील तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आलेली रामलल्लाची जुनी मूर्ती २२ जानेवारी रोजी नव्या मंदिरात अभिषेक केल्या जाणार्या नवीन मूर्तीसमोरच ठेवली जाणार आहे असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले. राम मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत ११०० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून काम पूर्ण करण्यासाठी आणखी 300 कोटी रुपयांची गरज भासू शकते, असेही ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात राम मंदिराच्या गर्भगृहात ५१ इंची रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. या मंदिरासाठी प्रभू रामाच्या एकूण तीन मूर्ती बांधण्यात आल्या होत्या, त्यापैकी म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठेसाठी निवड करण्यात आली आहे. इतर दोन मूर्तींचे काय होईल असे विचारले असता, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार म्हणाले, आम्ही त्या मंदिरात पूर्ण सन्मानाने ठेवू.
मूळ रामलल्लाच्या जुन्या मूर्तीबद्दल गिरी म्हणाले, ही रामलल्लासमोर ठेवली जाणार आहे. मूळ मूर्ती खूप महत्त्वाची आहे. तिची उंची पाच ते सहा इंच आहे आणि ती २५ ते ३० फूट अंतरावरूनही दिसू शकत नाही. त्यामुळे आम्हाला एका मोठ्या मूर्तीची गरज होती.अरुण योगीराज यांनी साकारलेल्या रामलल्लाच्या मूर्तीच्या निवडीबद्दल गिरी म्हणाले, तीनपैकी एक मूर्ती निवडणे आमच्यासाठी खूप अवघड होते. त्या सर्व अतिशय सुंदर आहेत. पण आम्ही दिलेल्या निकषांचे पालन केले आणि त्यातील एका मुर्तीची निवड करण्यात आली.
यातील पहिला निकष असा होता की चेहरा दिव्य तेजाच्या लहान मुलासारखा असावा. भगवान राम “अजानबाहू” (ज्या व्यक्तीचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात) होते. त्यामुळे हात तेवढ्या लांबीचे असावेत.निवडण्यात आलेली मुर्ती या निकषात बसणारी होती. त्यात मुलाचा नाजूकपणाही आम्हाला दिसत होता, तर दागिनेही अतिशय सुंदर आणि नाजूकपणे कोरलेले होते. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य वाढले,” असे ते म्हणाले.
तीन मूर्तींपैकी सर्वोत्तम मूर्ती निवडण्यासाठी ट्रस्टच्या सदस्यांना किती वेळ लागला, असे विचारले असता गिरी म्हणाले, की मी दर महिन्याला अयोध्येला जात असे. आणि ज्या ठिकाणी मूर्ती कोरल्या जात होत्या, त्या स्थळांना लोकांसाठी बंदी घातली गेली. मूर्ती तयार करण्यासाठी चार ते पाच महिने लागले. त्या पूर्ण झाल्यावर आम्ही एक दिवस मूर्ती पाहिल्या आणि निर्णय घेतला.
सनातन धर्मावर खोडसाळ भाष्य करणाऱ्यांना फटकारताना ते म्हणाले की लोकांना धर्म म्हणजे काय हे समजले पाहिजे. धर्म हे निसर्ग आणि श्रद्धेवर नियंत्रण करणारे मूलभूत नियम आहेत. तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका, परंतु वैज्ञानिक तत्त्वे अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे, धर्माची तत्त्वे शाश्वत आहेत. जे लोक त्यांना समजून घेतात आणि त्यांचे पालन करतात त्यांना फायदा होतो तर जे दुर्लक्ष करतात त्यांना काही फायदा होत नाही,असे गिरी पुढे म्हणाले.