लुधियाना –पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर गरज भासल्यास भाजप आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भाजपने तशी शक्यता फेटाळून लावली आहे.
पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल अनेक वर्षे मित्रपक्ष होते. मात्र, केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवत शिरोमणी अकाली दलाने 2020 वर्षाच्या अखेरीस भाजपबरोबरचे संबंध तोडले. त्यानंतर ते पक्ष पंजाबमध्ये स्वतंत्र आघाड्या करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र, राजकीय अपरिहार्यता उद्भवल्यास दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतात, असे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना भाजप आणि एसएडीमध्ये पुन्हा युती होण्याच्या शक्यतेचा इन्कार केला. आमच्यातील युती एखाद्या वाईट विवाहासारखीच होती. शिरोमणी अकाली दलाने पंजाबमध्ये भाजपचा विस्तार होऊ दिला नाही, असा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे दोन्ही पक्षांमधील दुरावा खूपच वाढल्याचे सूचित होत आहे. पंजाबमध्ये यावेळी अकाली दलाने बसपशी युती केली आहे, तर भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पक्षाला बरोबर घेतले आहे.