महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबतच्या सस्पेन्समध्ये वाढ
नवी दिल्ली -महाराष्ट्रातील सरकार स्थापनेविषयीच्या पेचावरील तोडगा म्हणून पाहिली जाणारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बहुचर्चित भेट सोमवारी येथे झाली. मात्र, त्या भेटीनंतर पवार यांनी केलेली वक्तव्ये संभ्रम निर्माण करणारी ठरली. त्या वक्तव्यांतून पवार यांनी राजकीय गुगली टाकल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मात्र, त्यामुळे सरकार स्थापनेबाबतच्या सस्पेन्समध्ये आणखीच वाढ झाल्याचे चित्र पुढे आले आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन नवी आघाडी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नव्या सरकारचा आधार म्हणून किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी त्या पक्षांत मागील काही दिवसांत चर्चेच्या फेऱ्याही झाल्या.
आता त्या कार्यक्रमावर सोनिया आणि पवार यांच्या भेटीत शिक्कामोर्तब होईल आणि नवी आघाडी स्थापण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे सोनिया-पवार भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागले होते. मात्र, सोनियांच्या निवासस्थानी सुमारे 50 मिनिटे चाललेल्या त्या बैठकीनंतरर पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेली वक्तव्ये सगळ्यांच्याच भुवया उंचावणारी ठरली.
सोनियांशी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, सरकार स्थापनेविषयी आमच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. सरकार स्थापनेचा कुठलाही निर्णय घेण्याआधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी इतर मित्रपक्षांशी चर्चा करतील. राजकीय स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊ. पुढील पाऊलांबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते चर्चा करतील, असे पवार यांनी नमूद केले.
किमान समान कार्यक्रमाबाबत सोनियांशी चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोनिया यांच्या भेटीआधी पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळेही तर्क-वितर्कांना उधाण आले. भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले. त्यांच्याविरोधात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन लढले. त्यामुळे त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा. आम्ही आमच्या राजकीय मार्गाने जाऊ, अशी सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकणारी टिप्पणी त्यांनी केली होती.