मुंबई – लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी (दि.11) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मृत्यूचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावू, पण दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका पुण्यातील काही व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
मुंबई व्यापार संघानेही महाराष्ट्र बंदला विरोध केला आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मात्र, उद्या दुकाने सुरु राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जिकरीचं जालं आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, मात्र दुकाने सुरु ठेवणार, अशी भूमिका मुंबई व्यापार संघाने मांडली आहे.
ठाण्यातही महाराष्ट्र बंदला विरोध
ठाण्यातीलही काही व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र बंदला विरोध केला आहे. या व्यापारी संघटनांनी आमचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचे सांगितलं आहे. कोरोनाकाळात व्यापार बंद असल्याने आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगत ठाण्यात काही संघटनांनी ही भूमिका घेतली आहे.
दरम्यान, लखीमपूर येथील शेतकरी हत्यांच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शनिवारी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.