पुणे(प्रतिनिधी) – घरच्यांच्या विरोधाला जुमानून केलेल्या प्रेमविवाहनंतर मुस्लीम दांपत्याने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एम.आर. काळे यांनी 14 दिवसात मंजुर केला आहे.
दोघेही 1 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. दोघांना परत एकत्र राहणे शक्य नाही. त्यांच्यामध्ये देणे-घेणे म्हणजेच स्त्रीधन व इतर अपत्याच्या ताब्याबाबत वाद नाहीत. कायद्याप्रमाणे घटस्फोट मिळण्याकरीता सहा महिन्याचे कूलिंग पिरेडची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद अॅड. आशिष संचेती यांनी केला. त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अमरदीप सिंग विरुद्ध हर्वीन कौर व राजकुमार सुरेल विरुद्ध मंजू तिर्की या निवाड्याचा दाखला दिला. त्यानुसार न्यालालयाने सहा महिन्याचा कुलिंग पिरीयड वगळून घटस्फोट मंजुर केला.
रेश्मा आणि वसीम (नावे बदलली आहेत) एकाच परिसरात राहत होते. एकमेकांना ओळखत होते. ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून दोघांनीही लग्न करायचे ठरवले. परंतु घरच्यांना एकमेकांची पसंती मान्य नव्हती. लग्नास नकार देण्यात आला होता. अशा परिस्थितीत दोघांनी ही घरच्यांच्या विरोधात जाऊन स्पेशल मॅरेज ऍक्ट1954 अन्वय 2017 साली लग्न केले.
दोघांना एक अपत्य आहे. परंतु लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्यात वाद-विवाद निर्माण झाले. तसेच दोघांच्या असे लक्षात आले की, दोघांनाही संसार करणे शक्य नाही. दोघांच्या आवडीनिवडी जुळत नाहीत. भविष्यात वाद नको म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. येथील न्यायालयात घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजुर केला.