चंद्रपूर- शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्यावर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी आपल्याला मिळावी असे विधान करून यासंबंधीच्या चर्चेला आणखी हवा दिली आहे.
सुप्रीम कोर्टाने गत 12 मे रोजी आमदार अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला होता. पण तेव्हापासून या मुद्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर सुप्रीम कोर्टाने धारेवर धरल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक सादर केले.
पण कोर्टाने त्यांच्या वेळापत्रकावर तीव्र नाराजी दर्शवत 30 ऑक्टोबर रोजी त्यांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी उपरोक्त विधान केले आहे.
नार्वेकर यांनी गुरुवारी चंद्रपूर येथील देवीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. आज आम्ही देवीचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपूरला आलो आहोत. मला महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी प्राप्त होवो, अशी प्रार्थना मी देवीचरणी केली आहे, असे ते म्हणाले.