Prithviraj Chavan – पक्षांतर बंदी कायदा कुचकामी ठरला आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. विधानसभा अध्यक्ष अजूनही आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाहीत. सर्वोच्च न्यायालय हतबल आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच ठोस निर्णय घेतला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष एका पक्षाचे आहेत.
त्यामुळे ते आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर काही निर्णय लवकर देतील असे वाटत नाही, असे मत कॉंग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan ) यांनी व्यक्त केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत, असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.
चव्हाणांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात आमची तीन पक्षांची आघाडी आहे. आम्ही राज्यात एकास एक उमेदवार देण्यावर भर देणार आहोत.
महाविकास आघाडी राज्यातील जागा वाटप एकत्र बसवून ठरवेल. यावेळी जागा वाटपावरून वादावादी होईल, घासाघीस होईल, एखाद दोन जागेवरून स्पर्धाही होईल. पण आम्ही जागा वाटपाचा प्रश्न सामंजस्याने सोडवू, असेही त्यांनी म्हटले आहे.
गायकवाड आयोगावेळी योग्य टक्केवारी नाही
मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले होते. पण आरक्षणासाठी गायकवाड आयोगावेळी योग्य टक्केवारी निघाली नाही. त्यामुळे तो प्रश्न मार्गी लागला नाही.
आता राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वेळ मागितला आहे. येणाऱ्या काळात काय होते ते पाहू असे त्यांनी म्हटले आहे.