नवी दिल्ली – लोकशाहीचा खरा अर्थ शोधण्यास भारताने मदत केली आहे. वंचित, गरजू आणि मागासवर्गीयांसाठी करुणा हा एक परवलीचा शब्द बनला आहे, अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज व्यक्त केल्या. देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशवासियांना उद्देशून दिलेल्या संदेशात या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्याच संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या महत्वाच्या आर्थिक सुधारणांबरोबर नाविन्यपूर्ण कल्याणकारी योजनांसाठीच्या पुढाकाराचाही उल्लेख केला. अलिकडच्या काळात विशेषतः करोनाच्या साथीनंतरच्या काळात जग नव्या भारताचा उदय अनुभवत आहे, असे त्या म्हणाल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा दारिद्य्र आणि अज्ञानामुळे लोकशाहीच्या प्रगतीबाबत अनेक नेते साशंक होते. मात्र भारतीयांनी हा समज चुकीचा ठरवला. देशात लोकसाही केवळ वाढली असे नव्हे तर लोकशाहीची मुळेही भक्कमपणे रुजली आहेत, असे सांगून राष्ट्रपतींनी सर्व देशवासियांना सर्वांची सुरक्षा, संरक्षण, प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहनही केले.
करोनाच्या काळात आपण दिलेल्या प्रतिसादाचे सर्वांकडून कौतुक होते आहे. जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान राबवले गेले. लस उत्पादनही केले गेले, याचाही उल्लेख राष्ट्रपतींनी केला. या यशाबद्दल त्यांनी संशोधक, डॉक्टर, परिचारिका आणि लसीकरण कर्मचाऱ्यांना धन्यवादही दिले. देशाची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. 2047 साठीच्या देशाच्या उभारणीमध्ये नवयुवकांचा सहभाग महत्वाचा असेल, असे आवाहनही त्यांनी केले.
देशातील महिलांच्या मतांचे महत्व भारतात पहिल्यापासून ओळखले गेले आहे. यातूनच लोकशाहीचा खरा अर्थ उमगायला भारताने अन्य देशांना मदत केली असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. देशाच्या समृद्धीमध्ये योगदान देणाऱ्या शेतकरी आणि उद्योजकांनाही राष्ट्रपतींनी धन्यवाद दिले. देशातील सर्वसमावेशकता वाढत आहे आणि धार्मिक असमानता घटत आहे. मात्र राष्ट्रीय शिक्षण धोरणातून यापेक्षाही अधिक प्रगती साध्य करायची आहे. आर्थिक विकासातून जीवनमान सुधारते आहे.
गरीबांसाठी घर हे स्वप्न आता स्वप्न राहणार नाही. असे सांगून राष्ट्रपतींनी “घरोघरी पाणी’ योजनेचाही उल्लेख केला. यासारख्या गरिबांसाठीच्या अन्य कल्याणकारी योजनांचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला. शिक्षण, आरोग्य, अर्थकारण यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे. ही प्रगती करताना नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांची जाण ठेवावी, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले. प्रत्येक निर्णयामध्ये देशाचा विचार सर्वप्रथम व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.