मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचार सभेत नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत त्यांची थेट अक्कल काढली. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. आर्थिक वर्ष संपायला ३ महिने शिल्लक आहे तरी कोकणात मंजूर झालेल्या निधीचा १ रुपया खर्च नाही. हा यांचा कारभार आणि आले मोठे अकलेचे धडे शिकवणारे असे णत राणेंनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला.
नारायण राणे म्हणाले, “मी अजित पवार यांना १०० कोटी रुपये तरी देऊन जा म्हणालो. लघुपाटबंधाऱ्याचे टेंडर काढलं नाही, १३ कोटी यायला पाहिजे होते, तिथे साडेसहा कोटी रुपये आले. त्यातील एकही पैसा खर्च नाही. वर्ष संपायला ३ महिने आहेत तरी १ रुपयाही खर्च नाही. हा यांचा कारभार आहे. त्यांना मी रस्त्यांची काय स्थिती आहे ते बघून जा म्हणून सांगितलं. विमानतळापासून सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.”
“हा यांचा कारभार आणि मोठे अकलेचे धडे शिकवतात. अर्थसंकल्प कसं मांडलं जातं यावरून आमच्या सर्व विचारवंतांची अक्कल कळते,” असा टोला नारायण राणे यांनी अजित पवार यांना लगावला.
अजित पवार म्हणाले, “सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा. कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचं अजिबात कारण नाही. इथं कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका अशी विनंती आहे.”