पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रतेच्या दोन परीक्षांत (टीईटी) आर्थिक घोटाळे झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींचे घबाडही सापडत आहे. त्यातच आता नोव्हेंबर-2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही घोटाळे झाल्याचा संशय बळावला आहे. त्यादृष्टीने पुणे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
सन 2018 व 2020 या दोन “टीईटी’च्या निकालांत फेरफार करुन आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पोलिसांनी काही मंडळींना अटक केली आहे. यात परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी.एस.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि.चा संचालक अश्विनकुमार, डॉ. प्रीतिश देशमुख, जी.ए.सॉफ्टवेअरचा माजी संचालक व विनर सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक सौरभ त्रिपाठी यांना यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
या सर्वांकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडू लागले आहेत. त्यातही पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुपे याच्याकडे सर्वाधिक घबाड सापडत आहे. प्रत्येक उमेदवारांकडून 50 ते 60 हजार रुपये घेऊन त्यांच्या निकालात फेरफार करण्यात आले आले असून, उमेदवारांच्या यादीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
“टीईटी’चा ठेका “विनर’ सॉफ्टवेअरकडे होता. या कंपनीचा संचालक सौरभ त्रिपाठीला आधीच्या परीक्षेतील गडबडीसाठी अटक झाली आहे. त्यामुळे या “टीईटी’तही काहीतरी गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, आता राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, संबंधित उपायुक्त, सहायक आयुक्त, अधीक्षक यांना चौकशीच्या फेऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या “टीईटी’तही मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. काही धागेदोरे हाती लागत असल्याने याबाबत परीक्षा परिषदेकडून आवश्यक ती कागदपत्रे ताब्यात घेऊन आणखी सखोल तपास करण्यात येणार आहे.
– रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे)