दिफु (आसाम) – देशाच्या ईशान्य भागातून सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (आफस्पा) पूर्णपणे हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच गेल्या आठ वर्षांत कायदा व सुव्यवस्था स्थिती सुधारली असल्याने या क्षेत्राच्या विविध भागांतून आफस्पा मागे घेतला जाऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आसामच्या करबी आँगलॉंग जिल्ह्यातील मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी म्हणाले, या भागातील हिंसाचारात 75 टक्के घट होऊन कायदा व सुव्यवस्था परिस्थिती सुधारल्यामुळे कायदे लागू करण्यात बदल झाले आहेत. त्यामुळे आधी त्रिपुरात व नंतर मेघालयात आफस्पा रद्द करण्यात आला.
कायदा व सुव्यवस्था परिस्थितीत काही सुधारणा नसल्याने आसाममधील गेल्या तीन दशकांतील यापूर्वीच्या सरकारांनी या कायद्याची मुदत वारंवार वाढवली. तथापि भाजपच्या “डबल इंजिनाचा’ परिणाम म्हणून आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता पुन्हा प्रस्थापित झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या आठ वर्षांत परिस्थितीवरील सुयोग्य नियंत्रणामुळे राज्याच्या बहुतांश भागांतून आफस्पा हटवण्यात आला आहे. उर्वरित भागांतूनही तो हटवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागालॅंड व मणिपूरच्या काही भागांत हा कायदा लागू आहे आणि तो पूर्णपणे रद्द करण्यासाठी आम्ही वेगाने काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.