पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित असलेल्या 350 महाविद्यालयांची संलग्नता अडचणीत आली आहे. त्रुटींची पूर्तता न केल्याने या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यासाठी पुणे विद्यापीठाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. यात महाविद्यालयांच्या संलग्नतेबाबत चर्चा झाली. त्यानंतर या सर्व विषयांवर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या आठवड्यात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी समितीची घोषणा करणार आहेत.
पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. यात पुणे जिल्ह्यातील सुमारे 350 महाविद्यालये आहेत. ही महाविद्यालये दरवर्षी विद्यापीठाकडून संलग्नता घेतात. ही संलग्नता घेण्यासाठी त्यांना 500 रुपयांच्या बंधपत्रावर महाविद्यालयांत प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांची पदे भरण्यासोबतच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा सहा महिन्यांत पुरविण्याचे लिहून देण्यात येते.
मात्र, प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे या महाविद्यालयांबाबत विद्यापीठाने कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. गरज भासल्यास या महाविद्यालयांची संलग्नता काढून टाकण्यात येईल. या महाविद्यालयांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्या परिषदेच्या सदस्यांनी दिली.
संलग्नता रद्द केल्यास…
- महाविद्यालयाचा विद्यापीठाशी असलेला संबंध तुटणार
- महाविद्यालयाची अधिकृतता संपुष्टात येणार
- विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रमाणपत्राला मुकणार
- परिणामी विद्यार्थ्यांबरोबरच संस्थेचेही शैक्षणिक नुकसान होणार
- विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणही अडचणीत येणार