पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ५२८ कोटी जमेचा आणि ६२७ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातील तूट वाढत असून, आता ही तूट १०० कोटींवर गेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ कोटींनी तूट वाढली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे यावेळी उपस्थित होते. स्थायी निधी आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांचा विचार करता वित्तीय नियोजन आव्हानात्मक झाले आहे. गुंतवणुकीवरील घटत्या व्याजामुळे विद्यापीठाच्या राखीव निधीत वाढत होत नाही.
विद्यापीठाने आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावे लागतील. आर्थिक काटकसर, योजनांचा प्राधान्यक्रम, उत्पन्न संसाधनांचा पुरेसा वापर या बाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे डाॅ. वायदंडे म्हणाले.
अर्थसंकल्पातील काही ठळक तरतुदी
विविध शिष्यवृत्तींसाठी : ८.२५ कोटी रुपये
विद्यापीठ बांधकामे : ४६ कोटी ५५ लाख रुपये
सुविधा-सुधारणा : ११ कोटी ११ लाख रुपये
गुणवत्ता सुधार कार्यक्रम : १२ कोटी
संशोधन : ५ कोटी रुपये
विद्यार्थी विकास मंडळ : १२ कोटी ५६ लाख रुपये
कर्मवीर भाऊराव पाटील कमवा : शिका योजना – ७ कोटी रुपये
विद्यापीठ कर्मचारी कल्याण योजना : ७ कोटी ७१ लाख रुपये
तांत्रिक त्रुटींवरून प्रशासन धारेवर…
अर्थसंकल्पातील तांत्रिक त्रुटींबाबत अधिसभा सदस्यांनी व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिसभेतही अशाच त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या. पुढच्या वेळी तरी अधिकार मंडळाच्या सदस्यांनी अभ्यासपूर्ण अर्थसंकल्प सादर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कुलगुरूंकडून त्या वादावर पडदा…
विद्यापीठाच्या अधिसभेत व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य आणि अधिसभा सदस्य सचिन गोर्डे पाटील यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच, सदस्याचे वर्तन घटनाबाह्य आणि गोपनीयतेचा भंग असून, याबद्दल निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी अधिसभेत सदस्यांनी केली.
या दोन्ही सदस्यांनी पत्रकार परिषद घेत विद्यापीठात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. शेवटी सदस्यांनी नियमांचे पालन करत कायदेशीर प्रक्रिया अवलंबावी, विद्यापीठाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन यापुढे काळजी घ्यावी, असे सांगत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी या वादावर पडदा टाकला.