राज्यात वृद्धांना पेन्शन देण्याची योजना
मुंबई, दि. 2 – वृद्धांना निवृत्तिवेतन देण्याची योजना अंमलात आणण्याबाबत महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे, असे समाजकल्याण मंत्री रुपवते यांनी म्हटले आहे. योजनेचे सर्वसाधारण स्वरूप, आर्थिक अंदाज इत्यादी तयार करण्याचे काम चालू असून ते दोन महिन्यांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. वृद्धांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य सरकार अनेक चांगल्या योजना राबवत आहेत. त्याचाच भाग म्हणून वृद्धांना आर्थिक स्वरूपात मदत केली जाणार आहे.
भारताबरोबर “युद्ध नको’चा करार केव्हा?
नवी दिल्ली – पाकचे परराष्ट्रमंत्री अझीझ अहमद यांनी असे म्हटले की, भारताबरोबर “युद्ध नको’चा करार करण्यास पाक तेव्हाच तयार होईल की जेव्हा भारताबरोबरचे सर्व तंटे शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी एखादी स्वयंशासित यंत्रणा उभारली जाईल. एरव्ही असा करार करणे व्यर्थ ठरेल. युद्ध नकोचा करार आम्ही विचारात घेऊ पण त्यात काश्मीरचा प्रश्न अंतर्भूत झाला पाहिजे. पण याबाबत आम्ही भारताशी बोलणी सुरू करण्यास तयार आहोत.