मुंबई – आरेमधून कारशेडची जागा कांजूरमार्गला हलविल्यानंतर येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते नागपुरात पत्रकरांशी बोलत होते.
बुलेट ट्रेनचे स्टेशन जमिनीच्या आत करायचे ठरवले तर त्याचा खर्च किमान पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल. आता ५०० कोटींमध्ये होणाऱ्या डेपोला जर सहा हजार कोटी लागले तर तो भुर्दंड बसेलच पण त्याचा जो वार्षिक देखरेखीचा खर्च आहे तोदेखील जवळजवळ पाच ते सहा पट अधिक असेल. त्यामुळे हे शक्य नाही, असे फडणवीसांनी सांगितले आहे.
कोणीतरी चुकीचे सल्ले देत आहे. पोरखेळ चालला असून मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मेट्रोचा हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. यामुळे शहर व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना सुविधा मिळणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर कारशेड कांजूरमार्गला उभारण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर भाजपाने कडाडून टीका केली. तसेच हे प्रकरण न्यायालयात गेले. यानंतर न्यायालयाने कांजूर येथील कामाला नुकतीच स्थगिती दिली आहे.
त्यामुळे आता मेट्रो कारशेडसाठी बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागेचा विचार होतो आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते आहे. न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला वेळ लागू शकतो. तोपर्यंत कारशेड उभारण्यास विलंब लागू नये म्हणून ठाकरे सरकारकडून पर्यायी जागेची चाचपणी सुरु आहे.