मुंबई – इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाड्या आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. तसेच दि. १९ जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम दि. २३ जुलै रोजी सायं. ५.३० पासून थांबविण्यात आले आहे.
दि. १९ जुलै २०२३ रोजी इरर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील ४३ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असून इरर्शाळवाडीतील २२८ इतकी लोकसंख्या होती. यापैकी या दुर्घटनेत २७ लोक मृत्यूमुखी, ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, असं तरी नैसर्गिक आपत्तीमधील दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी मराठी नाट्यसृष्टी इर्शाळवाडीसाठी पुढे सरसावली आहे. दुर्घटनाग्रस्तांना मदत म्हणून नाटकाच्या प्रयोगाचे उत्पन्न तसेच काही रक्कम देण्याची घोषणा काही कलाकारांनी केली आहे. “व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकाच्या एका प्रयोगाचे संपूर्ण उत्पन्न इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना देण्यात येणार आहे.
नूतनीकरणानंतर लवकरच खुल्या होणाऱ्या यशवंत नाट्यसंकुलात येत्या ५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता हा प्रयोग होईल, असे नाटकाचे निर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले आहेत. तर, दुसरीकडे ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या “करुन गेलो गाव’ या नाटकाचे तीन प्रयोग येत्या १५ ऑगस्ट रोजी होणार आहेत. त्यापैकी एका प्रयोगाच्या उत्पन्नापैकी ठरावीक रक्कम दुर्घटनाग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येईल, असे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितलं. अश्या प्रकारे अनेक मराठी कलाकार इर्शाळवाडीसाठी पुढे सरसावले असल्याचं पाहायला मिळत आहे.