मुंबई – बाईपण भारी देवा या चित्रपटापटामुळे सध्या दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच चर्चेत आले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. गेल्या तीन आठवड्यांपासून अवघ्या महाराष्ट्रभर याच चित्रपटाची चर्चा आहे. अशात केदार शिंदेनं राजकारणात येण्याबाबत सूतोवाच केला आहे. एका मुलाखतीतून केदार शिंदे यांनी राजकारणात येण्याबाबत भाष्य केलं.
केदार शिंदे म्हणाले, “माझी राजकारणात यायची खूप इच्छा आहे. सध्या सुरू असलेल्या राजकारणावर मी बोलणार नाही, पण आपण नेहमी कुंपणावर बसूनच बोलत असतो, आता ते ओलांडून रिंगणात यायची वेळ आहे. तरच मी म्हणेल मला त्यावर बोलायचा अधिकार आहे.” केदार शिंदे यांनी यावेळी आपल्या जीवनातील अनेक घडामोडींचे श्रेय राज ठाकरेंना दिले.
ते पुढे म्हणाले,”मनोरंजनक्षेत्रात काम करून मी घरात स्थैर्य आणेन अन् मगच राजकारणाकडे वळेन. सांस्कृतिकदृष्ट्या सकारात्मक काम करण्यासाठी मला राजकारणात जायचं आहे. राज ठाकरेंनी मला पडत्या काळात पाठिंबा दिला, त्यामुळे आता त्या माणसाबरोबर मला उभं राहायचं आहे” असं स्पष्ट मत केदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.
View this post on Instagram
बाईपण भारी देवा ठरला सुपरहिट
बाईपण भारी देवा या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्यांच्या आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. यामुळेच हा चित्रपट प्रत्येक महिलेला आपली कहाणी वाटतो. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने जंगी सेलिब्रेशन देखील केलं.