पारनेर – राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घेण्यात यावा, असा आदेश ग्रामविकास विभागातर्फे काढण्यात आल्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यास अक्षेप घेत, हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी करोना महामारीच्या काळामध्ये गावगाडा सुरळीत चालावा, यासाठी छातीवर दगड ठेवून हा निर्णय शासनाला घ्यावा लागला. यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही, असे हजारे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका होऊ न शकल्यास काय करावे, यासंदर्भात अधिनियमात तरतूद अस्तित्वात नाही.
त्यामुळे युद्ध, आणिबाणी, वित्तीय आणिबाणी व महामारी अशा परिस्थितीत निवडणूक घेता येणे शक्य नसल्यास योग्य व्यक्तीची निवड प्रशासक म्हणून शासनास करता येईल, असा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडून वित्त विभागाकडे व त्यानंतर विधी व न्याय विभागाने तपासल्यानंतर मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यामार्फत मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला होता.
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर व राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अध्यादेश निर्गमित करुन कायद्यात दुरुस्ती केली आहे.
राज्यातील एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमणुकीचे अधिकार शासनाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमणूक करावी, अशाप्रकारे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचा प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत असतो. जिल्हास्तरीय विविध समित्यांवर सदस्य पालकमंत्र्यांद्वारा नियुक्त केले जातात. पालकमंत्री त्या जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचा भाग म्हणून कार्यरत असतात.
जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष असता व जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतात. पालकमंत्र्यांना मी माझ्या स्वतःच्या स्वाक्षरीने पत्र लिहून ग्रामपंचायतींमधील सध्याच्या सरपंचाच्या आरक्षण निहाय गावातील कार्यक्षम व्यक्तींची निवड करावी, असे कळवले आहे.
एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये निवडीवरून काही वाद झाल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने निवड झाल्यास, ती रद्द करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला आहे. मला आपली भेट घ्यायची होती. परंतु करोना संकट काळामुळे ती घेता आली नाही. ज्यावेळेस आपली भेट होईल, त्यावेळेस मी याबाबत आपल्याला सविस्तर माहिती देईल. तसेच आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करतो, असेही मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे.