संतोष पवार
सातारा -जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाल दि. 21 मार्च रोजी संपत आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना मुदतवाढ न देता प्रशासकांची नियुक्ती करण्यात येते. याच धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेवर 32 वर्षानंतर प्रशासकराज येणार आहे. 1990 मध्ये तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून करण्यात आली होती. करोना प्रादुर्भावामुळे निवडणूक प्रक्रिया लांबल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट येणार हे आता निश्चित झाले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा कारभार चालतो. प्रशासन गतीमान करण्यासाठी पदाधिकारी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात. जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात प्रशासनाबरोबर पदाधिकाऱ्यांचाही मोठा सहभाग असतो. दर पाच वर्षांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची नव्याने निवड करण्यात येते. या प्रक्रियेसाठी प्रारंभी कच्चा प्रारुप आराखडा तयार करुन त्यावर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येते. प्रारुप रचना जाहीर झाल्यानंतर मंत्रालय स्तरावर अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येते. जिल्हास्तरावर सदस्यांची आरक्षण सोडत काढण्यात येते.
यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक आयोगास कच्चा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला आहे. अद्याप हा आराखडा प्रशासनाने जाहीर केलेला नाही. याशिवाय ओबीसी आरक्षणाचा विषयही अद्याप प्रलंबित असल्याने निवडणूक प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल दि. 21 मार्चला संपत आहे. तत्पूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी शक्यता नाही. परिणामी जिल्हा परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती होणार हे निश्चित आहे. यापूर्वी 29 जून 1990 मध्ये सातारा जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय उबाळे यांची नियुक्ती शासनाने केली होती. निवडणूक प्रक्रिया मुदतीत न झाल्याने प्रशासकांची नियुक्ती झाली होती. याच धर्तीवर दि. 22 मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
पंचायत समितीवर 14 मार्चला प्रशासक
जिल्ह्यातील 11 तालुका पंचायत समिती पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाल दि. 13 मार्चला संपत असून दि. 14 मार्चपासून या पंचायत समित्यांवर गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून असणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंचायत समिती सदस्यांचे फक्त 12 दिवस उरले असल्याने पंचायत समित्यांमध्ये मोठी धावपळ उडाली आहे. अद्याप निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी इच्छुकांनी मात्र आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधत मोहीम सुरु केली आहे.