मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजप यांच्या संयुक्त सरकारवर विरोधकांकडून वारंवार आरोप करण्यात येतात. विरोधकांकडून शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली असून राज्यातील काही नेत्यांच्या विरोधात मानहानीच्या नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या नोटिसीवरून आता आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरेंनी त्यावरून शिंदे गटावर तोंडसुख घेत“बांधावर जाऊन आम्ही पाहणी करत आहोत. दोनदा अतीवृष्टी झाल्यामुळे शेतकमुंबई ऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पण सरकार म्हणून कुणी पुढे आलेलं नाही. कृषीमंत्रीही गायब आहेत.उद्योगमंत्री काय करतायत, हेही कुणाला माहिती नाही. कारण महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. उद्योग आणि कृषी ह दोन महत्त्वाचे घटक कोलमडताना दिसत आहेत”, असे म्हटले आहे.
सोलापुरात काही भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. तसेच पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “खोके म्हटल्यावर शिंदे गटाला एवढं का झोंबतं?”असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. “खोके म्हणजे नक्की काय? त्यांना हे का झोंबतंय? हेही त्यांनी स्पष्ट करावं. खोके म्हणजे खोके असतात. त्याचा इतर काही अर्थ असेल, तर त्यांनी सांगावं हे आम्हाला.
“महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला, यांच्या गद्दारीची नोंद घेणाऱ्या ३३ देशांनाही याची नोटीस पाठवली पाहिजे. कारण खोके सरकार जगभर प्रसिद्ध झालं आहे. नोटीस द्यायच्या आधी त्यांनी एकच सांगावं, की त्यांना हे का झोंबलं आहे. मग त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना सगळं बोलू द्या. पण या गद्दार सरकारमध्ये प्रत्येकजण फक्त राजकारणावर लक्ष देत आहे. राज्यातून उद्योग निघून गेले, याकडे कुणाचंही लक्ष नाहीये. महाराष्ट्र एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी मागे चालला आहे. गद्दार त्यांचं घाणेरडं राजकारण करत आहेत. त्यांना त्यांचं राजकारण करू द्या, आम्ही जनतेची सेवा करत राहू”, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.