सातारा, (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसी प्रवर्गात झाला नसून, गुजरातमधील तेली जातीत झाला आहे, असे वक्तव्य करून, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत, भाजप जिल्हा कार्यकारिणीने सातार्यात निषेध केला. पोवई नाक्यावर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली, राहुल गांधी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात भाजपकडून शुक्रवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी जातनिहाय जनगणनेला विरोध केला आहे, कारण त्यांचा जन्म ओबीसी प्रवर्गात नव्हे, तर सामान्य जातीत झाला आहे. गुजरातमध्ये तेली समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात 2000 मध्ये झाला, असे बेताल वक्तव्य राहुल गांधी यांनी ओदिशातील सभेत केले. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, असा आरोप भारत जंत्रे यांनी केला. काँग्रेसने इतकी वर्षे धर्म आणि जातीवरून फूट पाडली. आता ते ओबीसींमध्ये फूट पाडत आहेत, असे भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले. काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा प्रकार केला आहे, असे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे म्हणाले.
यूपीए-2 सरकारमध्ये ओबीसींमधील केवळ एका व्यक्तीला मंत्रिपद देण्यात आले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण दिले नाही. धनगर आणि गोवारींच्या अनुसूचित जमाती आरक्षणात काँग्रेसनेच घोळ करून ठेवला आहे, असे असे मत महिला मोर्चा प्रदेश चिटणीस अॅड. अरुणा पाटील बंडगर यांनी व्यक्त केले.
भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे, मनीषा पांडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गौरी गुरव, सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण, कराड उत्तर मंडलाध्यक्ष शंकर शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, आप्पा कोरे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आंबेकर, युवराज मोरकर, किशोर पंडित, रवी लाहोटी, फत्तेसिंह पाटणकर, सुनील भोसले, अमोल कांबळे, सनी साबळे, सुनील लाड, इम्तियाज बागवान, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, वैशाली टंगसाळे, चित्रा माने, हेमांगी जोशी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.