पुणे, { प्रभात वृत्तसेवा} – वर्दळीच्या रस्त्यांच्या वळणावर, तसेच रस्त्यांच्या मधोमध महावितरणचे डीपी, खांब तसेच ट्रान्सफाॅर्मर उभे असतात. त्यामुळे रस्ते मोठे असले, तरी वाहतुकीस अडथळे येऊन वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे हे अडथळे हटवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे २२ रस्त्यांवर केलेल्या सर्वेक्षणात शहरभरात सुमारे ४० ठिकाणी असे अडथळे आढळले आहेत.
या कामासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद नसल्याने पथ विभागाकडून हा निधी दिला जाणार आहे. मनपा विद्युत विभागाकडून पुढील तीन महिन्यांत हे काम करून घेतले जाणार आहे. यात प्रामुख्याने सातारा रस्ता, नगर रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, विद्यापीठ रस्ता, हडपररस्ता, बाणेर रस्ता, बालेवाडी रस्ता, पाषाण रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग, नगर रस्ता, खराडी- हडपसर बायपास रस्ता या प्रमुख रस्त्यांसह विविध भागांंना जोडाणारे रस्ते यात समाविष्ट आहेत.
महापालिकेने गेल्या काही वर्षात विकास आराखड्यातील आरक्षणानुसार प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. हे रस्ते छोटे असताना कडेला डी.पी. तसेच ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात आलेले होते. तसेच रस्त्याकडेला पथदिवे होते. काही ठिकाणी चौकात बाजूलाच डीपी तसेच ट्रान्सफाॅर्मर आहेत.
वाहनांची संख्या वाढल्याने महापालिकेने रस्ते रुंद केले, तसेच अनेक चौकांचेही रुंदीकरण केले. मात्र, त्यावेळी महावितरणचे हे अडथळेच हटवलेले नाहीत. परिणामी, रस्ता रुंद होऊनही अडथळे कायम आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहेत.
शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. ती फोडण्यासाठी रस्त्यांतील अडथळे हटवण्यात येत आहेत. त्यात ४० ठिकाणी असे अडथळे आले असून, ते काढण्यास महापालिकेचे प्राधान्य आहे. – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा