नवी दिल्ली -अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली 5 जी सेवेला विरोध दर्शवणारी याचिका न्यायालयाने रद्द केली आहे.
त्याचबरोबर याचिकाकर्त्यांना 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्याचबरोबर जुहीने ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
5 जी नेटवर्कच्या तरंगांमुळे पर्यावरण आणि मानवी आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करावा, त्यासंदर्भात संशोधन करण्यात यावे, अशी जुहीची याचिका होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सांगितले की, ही याचिका केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल करण्यात आली होती.
या याचिकेला कोणताही आधार नाही, ही याचिका विनाकारण दाखल करण्यात आली आहे. याबद्दल सर्वप्रथम तिने सरकारकडे आपले म्हणणे मांडायला हवे होते.
त्याचप्रमाणे जुहीने या याचिकेच्या सुनावणीची लिंक सोशल मीडियावर व्हायरल केली असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. हे विकिरण पृथ्वीवरील पर्यावरणाचे असे नुकसान करतील जे पुन्हा कधीच भरून काढणे शक्य नसेल, असे जुही चावलाचे म्हणणे आहे.