अभिनेते बलराज साहनी यांचा आज स्मृतिदिन (निधन 13 एप्रिल 1973). त्यांचा जन्म 1 मे 1913 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील रावळपिंडी येथे झाला. त्यांचे जन्म नाव युधिष्ठिर असे होते. त्यांनी शासकीय महाविद्यालय, लाहोर येथे शिक्षण घेतले.
इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर ते रावळपिंडीला परत आले. या दरम्यान त्यांनी दमयंती यांच्याशी विवाह केला. या दोघांना परीक्षित हा पुत्र व शबनम अशी दोन अपत्ये झाली. परीक्षित हे अभिनेते म्हणून प्रसिद्ध झाले, मात्र कन्या शबनम हिचा लवकर मेंदूविकाराने मृत्यू झाला.वर्ष 1930 नंतर साहनी आणि त्यांच्या पत्नीने रावळपिंडी सोडले आणि शांतिनिकेतन येथे टागोरांच्या विश्व-भारती विद्यापीठात इंग्रजी आणि हिंदी शिक्षक म्हणून रुजू झाले. येथेच त्यांचा मुलगा परीक्षित याचा जन्म झाला. तेथे त्यांची पत्नी दमयंती पदवीचे शिक्षण घेत होती.वर्ष 1938 मध्ये त्यांनी महात्मा गांधींसोबत एक वर्ष काम केले. त्यानंतर गांधींच्या आशीर्वादाने, रेडिओ उद्घोषक म्हणून बीबीसी-लंडनच्या हिंदी सेवेत लंडन येथे सामील झाले. ते साम्यवादी विचारसरणीचे क्रियाशील कार्यकर्ते होते.
वर्ष 1943 मध्ये ते भारतात परत आले.साहनी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्यांनी इप्टाच्या नाटकांमधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. वर्ष 1946 मध्ये ‘धरतीके लाल’ या चित्रपटाद्वारे बलराज यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांनी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवण्याच्या खूप आधी, त्यांची पत्नी दमयंती एक इप्टाची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. या दोघांनीही वर्ष 1946 मधे ‘दूर चलें’ या चित्रपटात काम केले होते. त्यांच्या पत्नी दमयंती यांचे 1947 मध्ये निधन झाले. वर्ष 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटामुळे अभिनेता म्हणून त्यांची खरी ओळख झाली. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला होता.
‘दो बिघा जमीन’ या चित्रपटाशी बलराज यांची जोडलेली कथाही रंजक आहे. बिमल रॉय यांनी या चित्रपटासाठी बलराज यांच्या आधी अशोक कुमार, त्रिलोक कपूर यांच्या नावाचाही विचार केला होता. रॉय यांनी बलराज यांचा ‘हम लोग’ हा चित्रपट पाहिला आणि या चित्रपटात बलराज यांना मुख्य भूमिका देण्याचे ठरवले. बलराज सूट आणि बूट घालून बिमल यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांना पाहून ते एका तरुण रिक्षाचालकाची भूमिका साकारू शकेल असे बिमल यांना वाटत नव्हते. तेव्हा बिमल बलराज यांना म्हणाले, ‘साहनी साहेब, तुम्ही भूमिकेस अजिबात शोभत नाही. चित्रपटातील व्यक्तिरेखा एका गरीब रिक्षाचालकाची आहे.’ यावर साहनी यांनी बिमल यांना ‘धरती के लाल’ हा चित्रपट एकदा पाहण्याची विनंती केली. बिमल यांनी चित्रपट पाहिला आणि मग समाधानी होऊन बलराज यांना भूमिका दिली. यानंतर बलराज आपल्या भूमिकेच्या तयारीसाठी दररोज मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा चालवत.
दुसरा किस्साही मजेशीर आहे. एकदा बलराज एका मिरवणुकीत सामील झाले होते, जिथे हिंसाचार सुरू झाला तेव्हा साहनी यांना इतरांसह अटक झाली. त्यानंतर एके दिवशी के. आसिफ त्यांना भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचले आणि साहनी यांना ओळखल्यानंतर जेलरने त्यांना तुरुंगात राहून शूट करण्याची परवानगी दिली. यानंतर साहनी रोज सकाळी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जायचे आणि संध्याकाळी तुरुंगात परतायचे. सुमारे तीन महिने तुरुंगात राहून त्यांनी ‘हलचल’ चित्रपटाचे शूटिंग केले. सुमारे 100 च्या वर भावपूर्ण भूमिका करणारे म्हणून त्यांची ओळख कायम राहील.