राजगुरुनगर -खेड तालुक्यात सुमारे दोनशेपर्यंत करोना बाधितांचा आकडा पोहेचला आहे. तालुक्यात लॉकडाऊननंतर हा आकडा वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तरीदेखील नागरिकांकडून पाहिजे त्याप्रमाणात काळजी घेत नाहीत, म्हणून प्रशासकीय यंत्रणा प्रभावी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतल्यानंतर रविवारी (दि. 5) लगेचच त्याची तालुक्यात अंमलबजावणी करण्यात आली. विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर कलम 188 प्रमाणे पोलिसांनी कारवाई केली.
प्रशासनाचे सूचना करूनही काही नागरिक विनाकारण व किरकोळ कारणासाठी वाहने घेऊन फिरत आहेत व संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्यावर खेड पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. तोंडाला मास्क नसणे, विनाकारण फिरणारी दुचाकी अथवा चारचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. शहरातील 20 नागरिकांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. दुचाकीवर फिरणाऱ्या डबल-ट्रिपल दुचाकीवर फिरणारे, तोंडाला मास्क नसलेल्या नागरिकांवर पोलिसांनी चेकनाके उभारून कारवाई केली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक भारत भोसले, वाहतूक पोलीस हवालदार सर्जेराव बागल, प्रवीण गेंगजे, संजय रेपाळे यांनी सहभाग घेतला. खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहर, आळंदी, चाकण या मोठ्या शहरात तसेच ग्रामीण भागात करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाने व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सोमवारपासून 8 दिवसांचा बंद ठेवला आहे.
दोन वाइन शॉपीवर कारवाई
शहरातील पुणे -नाशिक महामार्गालगत असणाऱ्या अंगुर व विनित या दोन वाइन शॉपी यांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे त्यांच्यावरही पोलिसांनी केली कारवाई आहे.