प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची टीका
पुणे – पालिकेत एकहाती सत्ता असूनही शहरातील करोनाचा उद्रेक रोखण्यात भाजपला अपयश आल्याची टीका प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली. करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पुणे शहराची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी तिवारी यांनी राज्य शासनाकडे केली.
तिवारी म्हणाले, शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा स्थितीत महापालिकेच्या माध्यमातून भाजपने आवश्यक उपाययोजना करणे, रुग्णालयांची सुविधा वाढविणे, आरोग्य विभागासाठी तरतुदींना मान्यता देणे आवश्यक होते. मात्र, यातील कोणतीही जबाबदारी भाजपला पार पाडता आली नाही.
या स्थितीला महापालिकेचे आरोग्य प्रमुखही जबाबदार असून त्यांनाही ही स्थिती सक्षमपणे हाताळण्यात न आल्याने शहरात रुग्णांना खाटा मिळत नाहीत. तसेच खासगी रुग्णालयांच्या मनमानीचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले. तसेच आता राज्य शासनानेच याप्रकरणी लक्ष घालून करोना नियंत्रणासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, अशी मागणीही तिवारी यांनी केली. पुणे अर्बन बॅंकेचे संचालक सूर्यकांत मारणे, पीएमपी इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे यावेळी उपस्थित होते.