पुणे – पाऊस आणि रात्री निर्माण होणारा हवेतील गारवा यामुळे आता तापाच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे साथरोग असल्याने याची लागण वेगाने होत असल्याने, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सर्दी, ताप, खोकल्याचा सर्वाधिक त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत असून, खासगी आणि सरकारी बाह्यरुग्ण विभागांमध्ये अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. पावसाळापूर्व साथरोगांसंबंधी आरोग्य विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाइनफ्लू आणि अन्य फ्लूसंदर्भात आवाहन करण्यात आले होते. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, डासांचा प्रादुर्भाव, पैदास रोखणे, औषध फवारणी अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी
हे साथरोग असल्याने शाळेमध्ये ते वेगाने पसरतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास, पूर्णपणे बरे वाटत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात. त्यामुळे अन्य मुलांना लागण होऊ शकते. तसेच इन्फ्लुएन्झा लस देणे आवश्यक असल्याचेही बालरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे.
पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणासाठी पूर्वतयारी केली आहे. डासांची उत्पती रोखण्यासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापन करण्यात येत आहे. फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सोसायटी, खासगी, सरकारी ठिकाणे, आस्थापना यांनाही सूचना करण्यात आली आहे. ठिकठिकाणी तपासणीही सुरू आहे, असे पुणे महापालिका साथरोग विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले.
बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत
सध्या पर्यटनस्थळे तुडूंब भरली आहेत. वीकेन्डला पर्यटनकेंद्रांवर गर्दी असते. वर्षासहली, रिसॉर्टस फुल्ल झाली आहेत. त्यामुळे पावसात भिजणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे यामुळे कावीळ, टायफाइड याच्याही रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे असे अन्न-पाणी टाळावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.