आळंदी – 12 जून रोजी पंढरीकडे प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरी विठुरायाचे दर्शन घेऊन आज (दि. 12) तब्बल 30 दिवसांनंतर अलंकापुरीत सायंकाळी सहा वाजता परतली. या वेळी माऊलींचे थोरल्या पादुकापासून आळंदीच्या वेशीपर्यंत आळंदीकरांसह भाविकांनी देखील अगदी मनोभावे भक्तिरसात तल्लीन होत मुखी “माऊली माऊली’चा जयघोष करीत पालखीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले.
आळंदीच्या पालखी मार्गावर दुतर्फा रांगोळीच्या पायघड्या, खांद्यावर भगवी पताका, मुखी विठू नामाचा गजर करीत माऊली अलंकापुरीच्या दिशेने आली. थोरले पादुका मंदिर येथे ट्रस्टचे अध्यक्ष विष्णुपंत तापकीर तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रथम माऊलींचे स्वागत केले. तसेच स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर व त्यांचे सर्व सहकारी यांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले. त्याचबरोबर आळंदीच्या वेशी जवळ असणाऱ्या धाकटे पादुका येथे श्री ज्ञानेश्वर विद्यालय व देवकृपा सर्विस स्टेशन तसेच श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था (इंद्रायणी नगर) यांचे वतीने पालखीचे तसेच मानकरी सेवेकरी व सर्व घटकातील मान्यवरांचे विविध संस्था संघटना यांचे वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना चहा, नाश्ता, फराळ देण्यात आला. पालखी धाकटे पादुका येथे येताच पुष्पवृष्टी करण्यात आली आणि याचबरोबर फटाक्यांची आताषबाजी झाली.
सायंकाळी सहा वाजता माऊलींची पालखी आळंदीच्या नगरपालिका चौकात पोहोचली आणि त्यानंतर पालखी मंदिरात नेण्यात आली. येथे समाज आरती घेण्यात आली. यावेळी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. गुरुवार (दि. 13) माऊलींचा वार व एकादशी आहे. दुपारी माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेस निघून येथील ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिरात सर्व मानकरी, सेवेकरी, दिंडी चालक यांची हजेरी घेऊन संबंधितांना नारळ प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून, पालखी सोहळाची समाप्ती
होणार आहे.
3 ते 12 जुलै परतवारीचा प्रवास
ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास 3 जुलैला पंढरपूर येथून गुरूपौर्णिमेला गोपाळकाला झाल्यावर आळंदीकडे सुरू झाला. 3 जुलै वाखरी, त्यानंतर वेळापूर, नातेपुते, फलटण, पाडेगाव, वाल्हे, सासवड, पुणे मुक्कामानंतर आज (दि. 12 जुलै) आळंदीमध्ये प्रवेशित झाला आहे.