नवी दिल्ली – केंद्र सरकारमधील मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असून अनेक राज्यातील नेत्यांना त्यासाठी दिल्लीला बोलावण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातून नारायण राणे यांना आमंत्रण दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. सात राज्यांचे राज्यपाल बदलल्यानंतर या चर्चेला अधिक उधाण आले.
मंत्रीमंडळातील विस्तारासाठी केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपाकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या विस्तारात नव्या 20 चेहऱ्यांचा समावेश केला जाणार असल्याचे संकेत मिळत असून पक्षांतर करून भाजपात आलेल्यांना प्रथमच भाजपाच्या मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी पाच राज्यात होत असलेल्या निवडणुका लक्षात घेऊन त्या राज्यांना अधिक स्थान दिले जाणे असण्याची शक्यता आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, यात काही राज्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपातील वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. ज्यामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम झाला. यातच लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि पुढच्या विधानसभा निवडणूक असलेल्या उत्तर प्रदेशातही बिकट अवस्था बघायला मिळाली. त्यामुळे सरकारकडून मोठे फेरबदल करून प्रादेशिक, जातीय आणि राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मानले जाते.