प्रेमाचा त्रिकोण हा विषय घेऊन असंख्य चित्रपट आले. फार पूर्वीच्या चित्रपटांमधले हिरो खूपच सालस आणि पापभीरू असायचे. आपण ज्या मुलीवर प्रेम करतो, ती दुसऱ्याच माणसाच्या प्रेमात आहे हे लक्षात आल्यावर ते निमूटपणे तिच्या आयुष्यातून निघून जात असत. फारतर प्रेमभंगामुळे होत असलेल्या वेदनांचं गीत गात-गात तिचा निरोप घेत असत. अशी गीतं त्याकाळी खूप लोकप्रिय व्हायची, कारण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आनंदाचा विचार करणं हाही पुरुषार्थ मानला जात असे.
काही चित्रपटांत प्रेमभंग झालेला हिरो स्वतःला मद्याच्या व्यसनात बुडवून टाकत असे, तर काही चित्रपटांत तो आपल्या प्रेयसीसाठी सर्वस्वाचा, प्रसंगी जगाचाही त्याग करीत असे. त्यासाठी खलनायकाने अभिनेत्रीवर किंवा तिच्या प्रियकरावर केलेला हल्ला आणि तो रोखण्यासाठी ऐनवेळी तिथे पोहोचणारा हिरो अशी सिच्युएशन मुद्दाम तयार करण्यात येत असे.
पुढील काळातल्या काही चित्रपटांमध्ये हिरो-हिरॉइन दोघेही प्रेमासाठी जीवाचा त्याग करताना दाखवले गेले. अशा वेळी त्रिकोणातल्या तिसऱ्या कोनाचा तिरस्कार करत पब्लिक थिएटरमधून बाहेर पडत असे. कालांतरानं कोणत्याही परिस्थितीत आपलं प्रेम आपण मिळवायचंच, असा निर्धार करणारा “अँटी हिरो’ पडद्यावर झळकला. “डर’सारख्या चित्रपटांमधून तर या अँटी हिरोने हिरोवर प्राणघातक हल्लेही केल्याचं दिसलं. हा सगळा काळाचा महिमा म्हणावा लागेल. एकतर्फी का असेना, प्रेम केलंय ना? मग ते यशस्वीच झालं पाहिजे!
वास्तविक हीच पुरुषाची नैसर्गिक प्रवृत्ती असावी, असं वाटणाऱ्या घटना आपल्या आसपास आता दररोज घडतायत.
प्रेयसीसाठी त्याग करणं सोडा; पण प्रेयसीनं आपला त्याग केला, तरी तिला कुणाची होऊ द्यायचं नाही, अशा मानसिकतेतून क्रौर्याची परिसीमा गाठली जातीये. हैदराबादमध्ये “ब्रेकअप’ झाल्यानंतरही प्रेयसीवर आपलाच “हक्क’ आहे असं मानणाऱ्या माजी प्रियकरानं प्रेयसीच्या आजी प्रियकराला (जो त्याचा मित्रच होता) ठार मारलं. एवढंच नव्हे तर त्याचं हृदय आणि गुप्तांग कापून काढलं. मान आणि बोटं तोडली. हरिहर आणि नवीन हे दोघे मित्र एकत्र शिकायला होते.
त्याच कॉलेजमधील एका मुलीवर दोघांचाही जीव जडला होता. मात्र नवीनने पुढाकार घेतला आणि त्या मुलीने त्याला होकारही दिला. काही वर्षे त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. नंतर ते विझलं. मग हरिहरनने तिला मेसेज केले आणि फोनही केला. परंतु ब्रेकअप झाल्यानंतरसुद्धा नवीन सतत त्या मुलीच्या संपर्कात होता. हरिहरनने तिला मेसेज, फोन केल्याचं त्याला समजलं आणि त्याचा पारा चढला. तीन महिन्यांनी मद्य पिताना दोन मित्रांमध्ये वाद झाला. हीच संधी साधून नवीनने मित्राचीच अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि मृतदेह छिन्नविच्छिन्न केला.
हृदय बाहेर काढलेल्या मृतदेहाचे फोटो काढून जेव्हा त्यानं माजी प्रेयसीला पाठवले, तेव्हा ते पाहून मुलीचं काय झालं असेल याची कल्पनाही करता येणं शक्य नाही. एवढं सगळं झाल्यावर हा पठ्ठ्या सरळ पोलीस स्टेशनात हजर झाला. हे सगळं करताना त्याच्या मेंदूत जे घडलं असेल, त्याला काय म्हणायचं? प्रेमाचा माणूस “हक्काचा’ असतो; पण तो हक्क जबरदस्तीनं हिसकावता कसा येईल? प्रेमाची भीती वाटावी, असं जग बनवणार आहोत का आपण?
हिमांशू