हिमांशू
“लग्नाची आणि सरकार स्थापनेची बोलणी कधीही मीडियाच्या माध्यमातून करू नयेत…” व्वा! क्या खूब!! गेल्या आठवडाभरातलं आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं हे स्टेटमेन्ट. ते कुणी केलं याची चर्चा आम्ही इथे सहेतुक टाळली आहे. कारण हल्ली “कोण बोलतो’ याला इतकं अवास्तव महत्त्व प्राप्त झालंय की “काय बोलतो’ हे लक्षातच घेतलं जात नाही. शिवाय, वाक्य कितीही आवडलं, तरी ते उच्चारणाऱ्यानं स्वतः त्याचं तंतोतंत पालन केलेलं असेलच असं नाही.
उपरोक्त वक्तव्य ऐकून आम्हाला लग्नाच्या बोलाचालींची पद्धत कशी बदलत गेली, हे आठवलं. आता विवाहेच्छू मुलगा-मुलगी आधी ऑनलाइन भेटतात. पटलं तर प्रत्यक्ष भेटतात. तिथे पटलं तर घरच्यांना सांगतात आणि मग मुला-मुलीचे आईवडील एकमेकांना भेटतात. काही वर्षांपूर्वी हीच प्रक्रिया अगदी उलट होती. आता या प्रक्रियेची तुलना सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेशी कुणीतरी केलीच आहे म्हटल्यावर केवळ सत्तास्थापनेची नव्हे तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच आम्हाला आठवते. कारण ठिकठिकाणी “आमचं ठरलंय’ या वाक्यानंच ती सुरू झाली होती. जिथं-जिथं जे-जे ठरलं होतं, तिथं-तिथं तसंच घडलं की उलट घडलं याची चर्चा आता स्थानिक पातळीवर रंगलीय. त्याच वेळी लग्न ठरवल्याच्या थाटात सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी सुरू असाव्यात, असं राज्यातल्या जनतेला वाटतंय. वस्तुतः प्रत्यक्ष समोरासमोर वाटाघाटी हे लिहून होईपर्यंत सुरू नव्हत्याच!
लग्नाच्या आणि सत्तास्थापनेच्या बोलण्यांमधील एक ठळक फरक असा की, लग्नाच्या बैठकीत मानपानाचा विषय सगळ्यात शेवटी येतो आणि सत्तास्थापनेत तोच सर्वप्रथम येतो. कुणाला किती खाती हवीत आणि कोणती हवीत, याची चर्चा सर्वांत आधी रंगते. मग “तुमचं थोडं, आमचं थोडं’ असं सुरू होतं. मग कुठेतरी सेटलमेन्ट होते. आता अशीच प्रक्रिया लग्न ठरवताना होते, हे खरं असलं तरी मुला-मुलीचे आईवडील प्रत्यक्ष भेटून ती पूर्ण करतात. सत्ता ज्यांना स्थापन करायची आहे, ते मात्र एकमेकांना भेटायला तयार नाहीत की फोन करायला तयार नाहीत. तरीही आकडे, तपशील आणि ऑफर एकमेकांना कळतायत. हे कसं काय? इथेच माध्यमांची भूमिका सुरू होते.
अशा गोष्टी माध्यमांसमोर मांडायच्या नसतात, असं म्हणणारेसुद्धा कळत-नकळत आपली “चाणक्यगिरी’ माध्यमांसमोर दाखवत असतात. त्याचीच बातमी बनते. शिवाय, मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटप अजून व्हायचं असलं, तरी माध्यमांच्या कार्यालयांमध्ये खाती म्हणजेच “बिट्स’ ठरलेली असतात. ज्यांना सरकार स्थापन करायचंय, ते दोन्ही पक्ष एकमेकांशी बोलत नाहीत म्हटल्यावर राजकीय बिट कव्हर करणाऱ्या पत्रकारांनी करायचं काय? हे ओळखूनच दोन्ही पक्षांचं मीडियाद्वारे एकमेकांना निरोप धाडणं सुरू होतं, हे उघड गुपित!
एकमेकांशी बोलणीच झाली नव्हती, तर वेगवेगळ्या ऑफर्स आल्या कुठून? “”बातम्या आणि अग्रलेख वाचून आम्ही आमची वाटचाल ठरवत नाही,” असं कुणीही कितीही म्हटलं तरी अडचणीच्या काळात मीडिया हाच सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षांचा खरा आधार ठरला, हे त्यांनी मोकळेपणानं मान्य करायला काय हरकत आहे? कधी एकमेकांची ताकद जोखण्यासाठी, कधी सौदेशक्ती वाढवण्यासाठी तर कधी उगीचच पिल्लू सोडायचं म्हणून, मीडियाचाच तर उपयोग होत असतो. मग नाकारायचं कशाला?