कॉंग्रेसने उपस्थित केला सवाल
नवी दिल्ली: व्हॉट्सऍप मार्फत केल्या जाणाऱ्या हेरगीरीच्या प्रकरणात मोदी सरकारवरील आपली टीका अधिक कडक करताना मोदी सरकारच ही हेरगीरी करीत होते काय असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की सरकारला या हेरगीरीची पुर्ण कल्पना होती की नाही हे आता स्पष्ट होणे गरजेचे आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सरकार देशातील नागरीक आणि राजकीय नेत्यांचे फोनच्या माध्यमातून हेरगीरी करीत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष व्हॉट्सऍप स्पायगेटमधून निघत आहे. असा आरोपही त्यांनी केला.
खुद्द व्हॉट्सऍप कंपनीनेही आम्हीं सप्टेंबर मध्येच सरकारला असे होत असल्याची माहिती कळवली होती. त्यावर तेव्हाच कारवाई का झाली नाही असा सवालही कॉंग्रेसच्यावतीने उपस्थित केला जात आहे.
प्रियांका गांधींच्या फोनचीही हेरगिरी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या फोन हॅक केल जात असल्याचा संशय व्हॉटसऍपनेच व्यक्त केला होता. तसा “मेसेज’ही व्हॉट्सऍपने प्रियांका गांधी यांना पाठवला होता, असा दावा कॉंग्रेस पक्षच्यावतीने आज करण्यात आला. मात्र प्रियांका गांधी यांना हा मेसेज नक्की कधी मिळाला हे पक्षाने सांगितले नाही. प्रफुल्ल पटेल अणि ममता बॅनर्जी यांनाही अशाच प्रकारचे मेसेज व्हॉट्सऍपकडून मिळाले होते. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कॉंग्रेस पक्षचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ही माहिती दिली. ज्यांचे फोन कथितपणे हॅक झाले त्यांना व्हॉट्सऍपच्यावतीने असेच मेसेज जेंव्हा पाठवले गेले होते, तेंव्हाच प्रियांका गांधींनाही हा मेसेज मिळाला होता, असे सुर्जेवाला म्हणाले.