हिमांशू
आपल्याकडे काही पेशे असे आहेत, जिथे प्रामाणिकपणा आणि नैतिकता शोधून सापडणार नाही, अशी खात्रीच जणू सर्वांना झालेली आहे. याउलट काही पेशे असे आहेत जिथे संपूर्ण जग बदललं तरी नैतिकतेची अपेक्षा केली जाते. शिक्षक, डॉक्टर आणि पत्रकार यांच्याकडून प्रामुख्यानं अत्यंत आदर्श वाटचालीची अपेक्षा सर्वजण करतात. जग कितीही बदलू दे, इतर व्यवसायांमध्ये आणि पेशांमध्ये कितीही अप्पलपोटेपणा येऊ दे, संपूर्ण जग स्वार्थानं बरबटू दे… परंतु या मंडळींनी आदर्शच उभा करावा अशी अपेक्षा असते.
शिक्षक हा तर उद्याचे सुजाण नागरिक घडवणारा माणूस. त्याचं आचरण आणि विचार शुद्धच असायला हवा, ही समाजाची अपेक्षा रास्तच आहे. परंतु हजारो शिक्षकांना बारा-बारा वर्षे पगारच मिळाला नाही, हे कळलं तर समाजाची काय प्रतिक्रिया असेल? विनाअनुदान तत्त्वावर चालणाऱ्या शाळा-महाविद्यालयांमध्ये असे अनेक गुरुजन आहेत, जे दहा ते पंधरा वर्षांपासून
निःशुल्क ज्ञानदान करीत आहेत. इथं “ज्ञानदान’ या शब्दाचा अर्थ शब्दशःच घ्यावा लागतो. आज ना उद्या आपली संस्था अनुदानित होईल, या अपेक्षेनं ही मंडळी एकही पैसा मानधन मिळत नसताना जीव ओतून काम करीत आहेत. एखाद्या वर्षी पगारवाढ कमी मिळाली किंवा झालीच नाही तर घराचं बजेट कोलमडणार या भीतीनं ग्रस्त होणाऱ्यांनी ही परिस्थिती डोळसपणे पाहायला हवी.
शिक्षणाचा प्रसार वेगानं करण्यासाठी विनाअनुदान तत्त्वावर शाळा-महाविद्यालयं उभारली गेली. अनेक संस्थांच्या नावामागे “कायमस्वरूपी विनाअनुदानित’ असं बिरुद लागलं. नंतर अनेक खटपटी करून यातील “कायमस्वरूपी’ हा शब्द वगळण्यात शिक्षणसंस्थांना यश आलं; परंतु तरी गेल्या 19 वर्षांपासून हजारो शिक्षक बिनपगारी काम करीत आहेत. एकवेळ बेकारी परवडली; पण आशा ठेवून काम करणं आणि त्यात उमेदीची वर्षे वाया जाणं वाईट, असं त्यांना वाटत असणं स्वाभाविक आहे.
2017 मध्ये या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या शिक्षकांनी अनवाणी काम करण्याचं आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी आत्मक्लेश वगैरे आंदोलनं झालीच. सरकारने फक्त 1 हजार 628 शाळांना त्यावेळेपर्यंत अनुदान दिलं होतं, तेसुद्धा अवघं 20 टक्के! 2016 मध्ये ज्या शाळांना अनुदान जाहीर झालं, त्यांनाही निधी मिळालाच नाही. केवळ शाळाच नव्हे तर कनिष्ठ महाविद्यालयांमध्येसुद्धा असे असंख्य अध्यापक आहेत. मराठवाड्यात तर अशा शिक्षकांनी “अवयव विकणे आहे’ असे फलक लावून आंदोलन केलं. तत्पूर्वी घंटानाद, मुंडन, पदव्यांचं दहन आदी आंदोलनं करून पाहिली. परंतु या शिक्षकांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. अर्धनग्न आंदोलन, आत्मदहनाचे इशारे दिले तरी कुणी त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नाही.
शिक्षण हा जीवनाचा आधार मानला जातो. या मंडळींनी वर्षानुवर्षे सेवा केली हे वास्तव आहे. इतर शिक्षकांप्रमाणेच त्यांनी असंख्य विद्यार्थी तयार केले. त्यांच्या कोणत्या आणि किती मागण्या स्वीकारार्ह आहेत, यापेक्षा त्यांनी या क्षेत्राला अर्पण केलेल्या वर्षांचा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे.शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षकांच्याही डोक्यात आत्महत्येचे विचार घोळू लागले आहेत आणि हे गंभीर आहे. मुलांना सकारात्मक विचार देणारा शिक्षक नकारात्मक विचारांनी ग्रासला जाता कामा नये.