हिमांशू
“अरेस्ट तो उनका बाप भी नहीं कर सकताः’ वाह..! क्या बात है! केवळ आसनच नव्हे तर आहार, विहार, आचार, विचारांमधून जीवन सुंदर बनवण्याची कला म्हणून योगाकडे पाहायला शिकवणाऱ्या व्यक्तीचे हे ट्विट खरोखरच लक्षवेधी! त्याहून लक्षवेधी म्हणजे ऐन धामधुमीच्या काळात दोन पॅथींमध्ये लागलेली भांडणं.
वास्तविक, आपण सध्या अशा काळातून प्रवास करतो आहोत, जिथं समजून घेण्याची वृत्ती प्रत्येकाने जोपासणं गरजेचं आहे. शत्रू इतका अपरिचित आहे, की वयाचा आणि फिटनेसचा विचार न करता त्याने सर्वत्र हाहाकार माजवलाय. या शत्रूशी एक वर्षापेक्षा अधिक काळ लढल्यानंतर आपल्या भात्यातली अस्त्रं वाढणं अपेक्षित होतं; परंतु एकेक अस्त्र कमीच होत गेलंय.
हायड्रोक्सिक्लोरीक्विन, रेमडेसिविर अशी नावेसुद्धा उच्चारता न येणारी औषधं एकेकाळी आपला एकमेव आधार होती. प्लाझ्मा थेरपीने आशेचा किरण दाखवला होता. आज कोविडच्या उपचारपद्धतीतून हे सगळे शब्द वजा झालेत. वर्षभर गरम पाणी पिणारे आता कपाळावर हात मारून घेतायत आणि काढ्यांचा अतिरेक झाल्यामुळे काहींना उष्णतेचा त्रास झालाय.
अशा वेळी कोणती पॅथी श्रेष्ठ या विषयावर वादंग माजणं म्हणजेच आपल्या राजकीय संस्कृतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात शिरकाव करणं. समोरच्याला लहान म्हणून स्वतःला मोठं म्हणणं खरं तर राजकारणातही योग्य नाही; मग चिकित्सेच्या जगात तर नाहीच!
बाबा रामदेवांनी ऍलोपॅथी डॉक्टरांवर लागोपाठ केलेले हल्ले आणि त्यावर डॉक्टरांच्या संघटनांनी प्रत्युत्तरं दिल्यानंतर वाद वाढत जाणं किती दुर्दैवी आहे, हे ज्यांनी आप्त गमावलेत त्यांनाच खऱ्या अर्थानं समजू शकेल.
“ऍलोपॅथी डॉक्टर स्वतःला वाचवू शकले नाहीत, ते इतरांना काय वाचवणार,’ असं वक्तव्य बाबा रामदेवांनी केल्यानंतर वाद सुरू झाला आणि आता कोर्टात आणि खुल्या चर्चेच्या मैदानात आव्हान देण्यापर्यंत तो पोहोचलाय.
संतप्त झालेल्या डॉक्टरांच्या संघटनेनं म्हणजे आयएमएनं रामदेव बाबांना एक हजार कोटींची नोटीस पाठवलीय. माफी न मागितल्यास देशद्रोहाचाही गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिलाय. संघटना म्हणते, “आमचं बाबांशी वैयक्तिक भांडण नाही; पण त्यांचे अनुयायी भरपूर संख्येनं असल्यामुळे त्यांचं विधान ऍलोपॅथीविषयी मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवू शकेल.
त्यांनी विधान मागे घेतलं तरच आम्ही खटला मागं घेऊ.’ सोशल मीडियावर चर्चा वाढली तेव्हा रामदेव बाबा म्हणाले, “चालू द्या. सोशल मीडियावर ट्रेन्ड कसे चालवायचे, हे आम्हीही आता शिकलोय.’
ऐन धामधुमीत अशा उलटसुलट चर्चा पाहून सोशल मीडियाला “सोशिक मीडिया’ म्हणणंच जास्त संयुक्तिक ठरेल. आधीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि सरकार यांच्यात नव्या नियमावलीवरून जुंपलीय. त्यात रोजरोज असे झगडे!
असो, तूर्तास हे प्रकरण सोशल मीडिया आणि कोर्ट याच्याही पलीकडे गेलंय. दोन्ही लसी घेतल्यानंतर एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाला, असा दावा रामदेव बाबांनी केला होता. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना उद्देशून 25 प्रश्नांची भलीमोठी यादी प्रसिद्ध केली होती.
त्याला प्रत्युत्तर म्हणून आयएमएच्या उत्तराखंड शाखेनं बाबांना समोरासमोर चर्चेचं खुलं आव्हान दिलंय. पुढं जे होईल ते होईल; पण जगाला आपल्याकडे पाहून नाकं मुरडण्याची आणखी एक संधी निश्चित मिळेल!