कोण मंत्रिमंडळाच्या आत? कोण बाहेर? कोण आनंदात? कोण नाराज? कोण दुःखात? कोण तुरुंगाच्या आत? कोण बाहेर? कुणाला क्लीन चिट? कुणाला कशाचं फळ? कोण सगळ्यात आधी जाऊनसुद्धा अजून उपाशीच राहिलेत? कोण सगळ्यात उशिरा येऊन थेट पंगतीला बसले?कोण रात्री उशिरापर्यंत घुटमळत होते? कोण भल्या सकाळी तळमळत होते? कुणी कुणाला ऐकू जाईल अशा आवाजात कमेन्ट केली? कोण नाराज असूनही शांत राहिले? पहिल्या अठराजणात एकही महिला का नाही? दुसरा विस्तार कधी? त्यावेळी कुणाकुणाला संधी मिळणार? त्याहीवेळी डावललं गेलं तर कोण साथ सोडणार?
कुणी परतीच्या प्रवासाची “कुजबूज’ ऐन बैठकीत केली? कुणी पोस्टरबाजी केली? कुणी “सूचकपणे’ नाराजी बोलून दाखवली? “हेच करायचं होतं तर एवढा उशीर का,’ असा प्रश्न कुणी विचारला? मारल्यासारखं कुणी केलं? रडल्यासारखं कुणी केलं? …हे फक्त चाळीस टक्के प्रश्न आहेत. याच्या दीडपट प्रश्न अजून शिलकीत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार आणि तो लांबण्याचं नेमकं कारण काय? या एका प्रश्नावर अडतीस दिवस चर्चा चालली. मग विचार करा, उपरोक्त प्रश्नांवरची चर्चा किती दिवस चालेल? ही प्रश्नपत्रिका कुणासाठी सोपी आणि कुणासाठी अवघड आहे, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तितकंसं सोपं नाही. या पार्श्वभूमीवर जनतेची प्रश्नपत्रिका या मंडळींना मिळणार कधी आणि सुटणार कधी?
“याचसाठी केला होता अट्टहास’ हे भाव काल कितीजणांच्या चेहऱ्यावर दिसत होते! जे “तरून गेले’ त्यांच्या चेहऱ्यावर तर अधिक ठळकपणे! खरं तर “ऑगस्ट क्रांतिदिन’ होता काल. परंतु सतत प्रश्नपत्रिकेतच गुंतलेल्या “परीक्षार्थीं’च्या चेहऱ्यावर क्रांती वगैरे घडवण्याचा निर्धार दिसूच शकत नाही. त्यामुळेच जनतेला आजवर “कोरी उत्तरपत्रिका’च पाहावी लागलीये. खरंतर उपरोक्त प्रश्नपत्रिकेच्या शेकडो पटींनी अधिक प्रश्न वर्षानुवर्षे अनुत्तरित आहेत. सरकारं आली-गेली; प्रश्न मात्र कायम!
उदाहरणच घ्यायचं झालं तर इकडे विस्तार वगैरे सुरू असताना तिकडे अक्कलकोट तालुक्यात एका व्यक्तीचा मृतदेह घेऊन खांदेकरी नदीत पोहत होते. पुलाची मागणी 25 वर्षांपूर्वीची. म्हणजे किमान पाच सरकारं येऊन गेली. दर पावसाळ्यात नदीला पूर येतो. धरणाच्या फुगवट्यामुळे पाणी खूपच वाढतं. स्मशानभूमी नदीपल्याड. मग रिकाम्या बॅरलवर मृतदेह ठेवला जातो. पोहता येणारे लोक तो नदीपार घेऊन जातात. ऐनवेळी पाणी वाढलं तर काय होईल? जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या देशातल्या सर्वाधिक प्रागतिक राज्यातली ही परिस्थिती. गावाचं नाव पितापूर; पण पितृत्व कुणीच स्वीकारेना! हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे.
जनतेच्या प्रश्नपत्रिकेतले असे असंख्य प्रश्न सर्वांनीच वर्षानुवर्षे “ऑप्शन’ला टाकलेत. “तुमच्या काळात काय केलंत,’ असंही कुणी कुणाला विचारू शकत नाही, अशी खेड्यांची दुरवस्था आहे. दुर्गम गावं दरड कोसळण्याची टांगती तलवार डोक्यावर घेऊन झोपतायत. आपण कितीतरी बाबतीत खूप मागे आहोत, हे प्रत्येक पावसाळा आपल्याला दाखवून देतोय; पण राजकारणात इतके पावसाळे पाहूनसुद्धा सर्वसामान्य माणसाचा किमान शेवटचा दिस तरी गोड व्हावा, हा “अट्टहास’ कुणाच्याच चेहऱ्यावर नाही!
हिमांशू