खेड – मागच्या तीन वर्षात नियमित पाणी येईल असं वाटलं होतं. माझ्याकडून तुमची हेळसांड झाली असेलही पण, इतकी होईल असं वाटलं नव्हतं. आता मी पण आलो अन् आपलं सरकारही परत आलं. ज्या दिवशी निवडून आलो त्याच दिवशी कॅनॉल सुरू झाला. मी जलपूजन करत नाही तर मी पाणी पाठवून द्यायचं काम करतो आणि हे पाणी पोहोचलय का नाही? ते पाहायला मी आलो आहे, असा टोला आमदार प्रा.राम शिंदे यांनी लगावला.
करमनवाडी येथील तलाव कुकडीच्या पाण्याने भरण्यात आला आहे. या पाण्याच्यापूजनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुन्हा एकदा जनसेवेत हजर झालेल्या शिंदेंना येथील ग्रामस्थांनी पाण्याबाबत आजपर्यंत आलेल्या अडचणी बोलून दाखवल्या. यावेळी राम शिंदे यांनी तलाव भरेपर्यंत पाणी बंद करायचे नाही, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांचा कळवळा आल्याच्या फक्त बातम्या झळकतात पण, आता इथून पुढे शेतकऱ्यांची थट्टा करायची नाही’ असा नाव न घेता आ.रोहित पवारांवर त्यांनी निशाणा साधला. ग्रामस्थांनी आ.राम शिंदे यांच्या निवडीचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.
सरपंच भरत पावणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.सुनिल गावडे, शांतीलाल कोपनर, सुदर्शन कोपनर, गणेश पालवे, बंडू मोढळे, शरद पावणे, संतोष पाडुळे, अशोक बनसोडे, गणपत सायकर, शिवाजी पवार, अशोक पवार, आगत पावणे, दिलीप पावणे, कैलास कायगुडे, संतोष कायगुडे, गोरख पावणे, सुभाष ठोंबरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश मराळे तर आभार पुणेकर यांनी मानले.
..अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला!
ग्रामस्थांच्या हस्ते तलावाचे जलपूजन झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रा.राम शिंदे यांनी करमनवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी “मी पुन्हा आलो आणि तेही सरकार घेऊन आलो. पंगतीला बसायला आणि बुंदी संपायला मी थोडीच खडसे आहे’ असे म्हणल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.