पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून मिळणार आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च तर दहावीची लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे. परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी किंवा आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. प्रश्नपत्रिका मोबाइलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी, अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर देण्याबाबतचा निर्णय मागील वर्षी राबविण्यात आला होता. यंदाही याप्रमाणेच वेळ वाढवून देण्यात येणार आहे. याबाबत राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली आहे.
सुधारित वेळ
विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात सकाळी १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात दुपारी २.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात सकाळी ११ वाजता तसेच दुपार सत्रात ३ वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होणार आहे. सकाळ्च्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी २ या एवजी सकाळी ११ ते दुपारी २.१० अशी परीक्षेची सुधारित वेळ असणार आहे. दुपारच्या सत्रात दुपारी ३ ते सायंकाळी ६ याएवजी दुपारी ३ ते सांयकाळी ६.१० अशी परीक्षेची सुधारित वेळ असणार आहे.