करोनाचा प्रकोप कितीही वाढत असला आणि सीमेवर शत्रूच्या कशाही हालचाली सुरू असल्या, तरी सुज्ञ लोकांनी तिकडे लक्ष द्यायची बिलकूल गरज नाही. कारण 21 जून रोजी सगळंच संपणार आहे म्हणे! ही जगाच्या अंताची “नवीन तारीख’ आहे. याचा अर्थ तुम्ही-आम्ही आणखी फक्त चारच दिवस सोबत आहोत. 21 तारखेला महाप्रलय होणार आणि जग नष्ट होणार! खरं तर 21 डिसेंबर 2012 रोजीच जग नष्ट होणार होतं; परंतु जादाची आठ वर्षें आपल्या पदरात पडली, असं सांगितलं जातेय. 2012 मध्ये पृथ्वीचा अंत होण्याची बरीच कारणे दिली गेली होती. कुठलासा लघुग्रह येऊन पृथ्वीवर आदळेल, असं कुणीतरी सांगितलं होतं. कुणी म्हणालं होतं की जागोजागी स्फोट होऊन पृथ्वी संपेल. कुणी माया संस्कृतीकडे बोट दाखवून त्या लोकांनी 21 डिसेंबर 2012 पर्यंतचंच कॅलेंडर तयार केलंय, असं सांगितलं होतं. माया संस्कृतीतील लोकांना जगाच्या अंताची तारीख ठाऊक होती आणि म्हणूनच त्यांनी त्या तारखेपर्यंतचं कॅलेंडर बनवलं होतं, असं जगभरातले काही “विद्वान’ सांगत होते. परंतु 2012 मध्ये काहीच झालं नाही. जो लघुग्रह पृथ्वीवर धडकेल असं सांगितलं होतं, तो पृथ्वीच्या कक्षेच्या जवळपासही येणार नाही, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं ते खरं ठरलं. तरीही हे भाकित वर्तवण्याची “रिस्क’ सध्या अनेकांनी घेतलीय.
जगाच्या अंताची “नवीन तारीख’ सांगणारे लोक गणिती भाषेत बोलतायत. त्यांच्या मते, जग 2012 रोजी नष्ट होणार हे खरंच होतं. परंतु आपण वापरतो ते ग्रेगरियन कॅलेंडर 1582 ला लागू झालं. तत्पूर्वी वापरात असलेल्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये वर्षाचे 376 दिवस मानले जात असत. ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये 365 दिवसच मानले गेल्यामुळे प्रत्येक वर्षाचे 11 दिवस कमी झाले. 1582 पासून प्रत्येक वर्षाचे 11 दिवस जमेस धरता ज्युलियन कॅलेंडरनुसार आजही आपण 2012 सालातच आहोत. (हे वाक्य राजकारण्यांनी दुर्लक्षित करावं; कारण सत्ताधारी खचून जातील आणि विरोधकांना हर्षवायू होईल. आपल्याकडील निवडणुका ज्युलियन कॅलेंडरनुसार नव्हे तर ग्रेगरियन कॅलेंडरनुसार झालेल्या आहेत. त्यामुळे आपण राजकीयदृष्ट्या 2020 मध्येच आहोत. गैरसमज नसावा!) थोडक्यात, जगाचा अंत होण्याची तारीख ग्रेगरियन कॅलेंडरप्रमाणे काढलेली नसून, ती ज्युलियन कॅलेंडरनुसार काढलेली आहे, हे भाकित करणाऱ्यांना 2012 मध्ये ठाऊक नव्हतं. 2012 मध्ये जेव्हा जगाची सही सलामत सुटका झाली, तेव्हाही त्यांना ते कळलं नाही आणि त्यानंतरही तब्बल आठ वर्षे ही मंडळी शांतच राहिली; परंतु असे भाकितकर्ते फार काळ गप्प बसू शकत नाहीत. काही ना काही भाकितं वर्तवणं आवश्यकच असतं.
काही का असेना, यावेळी या भाकितकर्त्यांना सलाम ठोकावासा वाटतो. कारण यावेळी त्यांनी तणाव वाढवला नसून कमी केलाय. करोनाचा विषाणू कुणालाच जुमानत नाही. उभ्या जगाशी संबंध बिघडवून घेतल्यानंतर चीन आता भारतावर गुरगुरतोय. अर्थव्यवस्था रसातळाला गेलीय. कोट्यवधी रोजगार हरपलेत. समस्यांचा प्राधान्यक्रम कसा लावावा, हेही कळेनासं झालंय. अशा स्थितीत “जगच नष्ट होणार’ हे त्यातल्या त्यात बरं वाटतंय. किमान “इतरांचं होईल, तेच आपलं होईल,’ असं तरी म्हणता येतंय!
– हिमांशू